नागपूर : महाराष्ट्रातील जनतेला ईव्हीएमद्वारे मतदान आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघातील मतदान आणि ईव्हीएममधील मतांची संख्या यात मोठी तफावत दिसून आली. एवढेच नव्हेतर सायंका‌ळी ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत अचानक मतांची टक्केवारी वाढली. यावर लोकांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…आनंदवार्ता… नागपुरात यकृत प्रत्यारोपण केंद्र.. गरीबांना शासकीय…

विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीने बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरु केले, त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. यशवंत भिंगे, सुर्यवंशी, पवार आदींचा समावेश होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची जनतेची मागणी आहे. त्यावर आयोगाने निश्चित विचार केला पाहिजे असेही म्हटले आहे.

माकरडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, मारकडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारतमाता असून गावकऱ्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मारकडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीने खरा मार्ग दाखवला आहे. ईव्हीएम व सर्व सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरु आहे त्याविरोधात मारकडवाडीने आंदोलन छेडले आहे. आता बॅलेटपेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केले.

हेही वाचा…काँग्रेसचे नेते करत काहीच नाही; केवळ…

महाराष्ट्रात मतदानच्या दिवशी सायंकाळी ५ ते ११.३० वाजता तब्बल ७६ लाख लोकांनी मतदान केले. हे जवळपास सात ते आठ टक्के मतदान आले कुठून असा सवाल जनता उपस्थित करीत आहे. मारकडवातील लोकांचा देखील त्यांचे मत गेले कुठे, असा प्रश्न आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of maharashtra raised doubts about voting through evms and role of election commission rbt 74 sud 02