नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी यवतमाळनजीक भारी शिवारात महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून अनेकांना कलम १४९ अन्वये नोटीसही बजावण्यात आल्या आहेत.

आर्णीचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी ढाणकीतील काही जणांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह बोलणे किवा कुणाच्या भावना दुखावणऱ्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकणे, वक्तव्य करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे, तसेच परवानगी न घेता मिरवणूक काढणे किंवा सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

हेही वाचा – कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी एकत्र येता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे. आर्णी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी गणेश मारोती राठोड यांना अशाच प्रकारची नोटीस पाठवली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या दिवशी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून शांतता भंग केल्यास, सामाजिक भावना दुखावल्यास कारवाई करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी पाठवलेली नोटीस हा दडपशाहीचा प्रकार असल्याची टीका होत आहे