* महाड दुर्घटनेचा धडा
* प्रादेशिक, जिल्हास्तरावर उपविभागाची स्थापना
महाड पूल दुर्घटनेसाठी सरकारी बेपर्वाई कारणीभूत ठरल्याच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने जीर्ण पुलांचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला आहे. आतापर्यंत केवळ नवीन इमारती, बहुपदरी रस्ते बांधणीला महत्त्व देणाऱ्या या विभागाने आता पुलांसाठी प्रादेशिक पातळीवर स्वतंत्र विभाग आणि उपविभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासकीय इमारतींचे बांधकाम, नवीन रस्ते, पूल, त्यांची दुरुस्ती यासह तत्सम कामे केली जातात. या कामात पुलांची देखभाल दुरुस्तीला आवश्यक तेवढे प्राधान्य दिले जात नाही. यातूनच महाड दुर्घटना घडली होती. यानंतर सरकारवर टीकाही झाली होती. त्यामुळे जुन्या व जीर्ण झालेल्या पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन विभागाच स्थापन करण्याचा निर्णय बांधकाम खात्याने घेतला असून यासंदर्भात १६ सप्टेंबरला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. यामुळे आता फक्त पुलांच्या कामासाठी स्वतंत्ररीत्या काम करणारी यंत्रणा निर्माण झाल्याने देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष देणे शक्य होणार आहे.