बुलढाणा : यंदाच्या पावसाळ्यात खरीप पिके व लाखो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा वारंवार फटका बसला आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या १ लाख ८० हजार ३६८ शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी १२१ कोटी ८९ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय आज मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच आजअखेर नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधितांना २१९ कोटी ७० लाख रुपये इतका मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री तथ‍ा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील आहे. अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत निधीला मान्यता दिली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी २२ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार अवकाळी पाऊसामुळे बाधित १४ हजार ९०९ शेतकऱ्यांना १५ कोटी ५५ लाख रुपये इतका मदत निधीस मान्यता दिली आहे. तसेच ६ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख हजार रुपये इतका निधी देण्यात आला.

१७ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ८ हजार ३८७ शेतकऱ्यांना ७कोटी ८० लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली. यापाठोपाठ आज २३ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरामुळे बाधित १ लाख ८० हजार ३६८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ८९ लाख रुपये निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन संवेदनशील

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून सद्या बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टी झाली आहे. या नुकसानग्रस्त भागातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पिकांचे तत्काळ पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवावा, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांचे तातडीने पंचनामे केल्याने बाधित शेतकऱ्यास दिलासा देण्यात आला,अशी भावना ना. मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केली.