नागपूर : लोकशाहीमध्ये निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “मणिपूरमधील वाद मिटवण्याला प्राथमिकता द्या”, मोहन भागवत यांचे विधान चर्चेत!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग २ चा समारोपीय सोहळा सोमवारी रेशीमबाग मैदानावर पार पडला. यावेळी श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला छत्रपती संभाजीनगरचे पीठाधीश रामगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उद्याोगपती मुकेश अंबानी यांचे जावई आनंद पिरामल, अभिनेते नाना पाटेकरांचे पुत्र मल्हार पाटेकर, भारत बायोटेकचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष कृष्णा एला हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी भागवत म्हणाले, की देशाच्या संचालनासाठी निवडणूक ही बाब महत्त्वाची आहे. मात्र त्यावरच इतकी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. संघ अशा चर्चेत पडत नसून दर निवडणुकीत मतदानवाढीचा आम्ही प्रयत्न करतो. दोन्ही पक्षांना आपापल्या बाजू मांडता याव्या यासाठी संसद असते. दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पैलूंवर विचार करतात. निवडणुकीच्या स्पर्धेतून आलेल्या लोकांमध्ये अशी सहमती बनणे कठीण असते. प्रचारादरम्यान समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विनाकारण संघासारख्या संघटनांनादेखील यात खेचण्यात आले. तंत्रज्ञानाची मदत घेऊन असत्य बाबी पसरवण्यात आल्या. अशाने देश कसा चालेल, असा प्रश्नही डॉ. भागवत यांनी केला. विरोधी पक्षाऐवजी प्रतिपक्ष हा शब्द योग्य वाटतो. तो एक विचार मांडतो. त्यांच्याही विचाराचा आदर व्हायला हवा. आपल्या देशासमोरील आव्हाने संपलेली नाहीत. एनडीएचे तेच सरकार परत आले. मागील दहा वर्षांत बरेच काही चांगले झाले, असेही डॉ. भागवत म्हणाले.

पापाचे प्रायश्चित्त करायला हवे

समाजात एकात्मता व संस्कार हवेत. आपला समाज विविधतेने नटलेला आहे. मात्र सर्वांचे मूळ एकच आहे. दुसऱ्यांच्या मताचा सन्मान करायला हवा. आपण आपल्याच भावंडांना अस्पृश्य म्हणून बाजूला ठेवले. त्याला वेद, उपनिषद यांचा आधार नाही. अस्पृश्यता, भेदभाव कालबाह्य आहे. समाजात अन्याय झाल्याने एकमेकांबद्दल द्वेष व अविश्वास आहे. अन्यायाप्रती असलेल्या संतापामुळे समाजातील लोक नाराज आहेत. त्यांना सोबत आणायला हवे, असे आवाहन भागवत यांनी केले.

मणिपूरच्या शांततेला प्राधान्य द्या

आपल्याला विकासाचे मापदंड ठरवावे लागतील. त्यासाठी देशात शांती हवी आहे. मणिपूर एका वर्षापासून पेटतो आहे. जुने वाद बंद झाले असे वाटत होते. मात्र द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राथमिकता द्यायला हवी, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling party and opposition should pay attention to consensus politics says rss chief mohan bhagwat zws