लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: कुठलाही लेखक काही काचमहालात बसून लेखन करीत नाही. भोवताल घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटतातच. व्यवस्थेमुळे भोवताल अस्वस्थ होत असेल तर तो व्यवस्थेला प्रश्न विचारणारच. त्यात गैर काय, असा परखड सवाल अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी उपस्थित केला. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्ताने लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते.

डॉ. शोभणे म्हणाले, लेखक कोणताही विशिष्ट झेंडा हातात घेऊ शकत नाही म्हणून तो लेखणी हातात घेतो. त्या लेखणीद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरे मागतो. कारण, ते प्रश्न त्याचे एकट्याचे नसतात. ज्या समाजाने त्याला लेखक म्हणून ओळख दिली असते त्या समाजाचे ते प्रश्न असतात. असे प्रश्न विचारण्यात काहीही गैर नाही. उलट ते लेखकाचे कर्तव्यच आहे. मी माझ्या कादंबऱ्यांमधून याआधीही नैतिक अध:पतनाविरोधात प्रश्न विचारतच आलो आहे. परंतु, ‘तुम्ही प्रश्न विचाराच’ असा दबाव लेखकावर नसावा. शेवटी तो त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे. साहित्य क्षेत्र व व्यवस्था यांच्यातील वर्तमान संबंधांबाबत विचाराल तर चित्र काही फारसे समाधानकारक नाही.

आणखी वाचा-बुलढाणा: ‘समृद्धी’वरील अपघात थांबवण्यासाठी आता महामृत्युंजय यंत्र!

आधी राजकीय नेत्यांची वाङ्मयीन जाण दांडगी असायची. ते पुस्तके वाचायचे, लेखकांचा कल समजून घ्यायचे. आजची राजकीय मंडळी मात्र साहित्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शासन मराठी भाषेविषयही गंभीर दिसत नाही. रोज कुठली तरी एक मराठी शाळा बंद पडत आहे. महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात मराठीचा मान पहिला हवा, पण ती क्रमात तिसऱ्या स्थानावर आहे. मातृभाषेची ही उपेक्षा संपायला हवी. हे झाले सरकारी पातळीवरचे. मराठीच्या संवर्धनाची नैसर्गिक जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्या नवलेखकांनीही मराठीच्या अस्तित्वासाठी पुरेशा गांभीर्याने लेखन केले पाहिजे. मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात असे लेखक फारच कमी आहेत. समकालीन वास्तव टिपून ते लेखनाचा आधार बनवण्यासाठी जी दृष्टी हवी असते ती विदर्भातील लेखकांकडे दिसत नाही, हे मला खेदाने नमूद करावेसे वाटते, असेही डॉ. शोभणे म्हणाले.

साहित्य क्षेत्रातही कंपूशाही

मी स्फूट लेखनापासून लिखाणाला सुरुवात केली. कविता, नाटक, समीक्षा हे साहित्य प्रकारही हाताळले. परंतु, या प्रवासातील एका वळणावर असे लक्षात आले की कादंबरी हीच आपल्या लिखाणाची मूळ ओळख ठरू शकते. त्यासाठी आवश्यक क्षमता व संयम दोन्ही आपल्याकडे आहेत. त्यातूनच मी कादंबरीकडे वळलो. प्रदीर्घ चिंतनातून कादंबरी साकारली. अनेकदा पुनर्लेखन केले. एक कादंबरी ते दुसरी कादंबरी यांच्या मध्ये सात-सात वर्षांचा रिक्त काळ गेला. प्रवाह, कोंडी, रक्तध्रुव, उत्तरायण, पडघम, अश्वमेध, होळी अशा कादंबऱ्या जन्मास घातल्या. त्यांचे कौतुक, सन्मानही झाले. कारण, त्या काळात लिखाणाच्या दर्जावरून लेखकाची गुणवत्ता ठरायची. परंतु, मागच्या दहा-पंधरा वर्षात साहित्य क्षेत्राचे स्वरूप बदलले आहे. दुर्दैवाने या क्षेत्रातही कंपूशाही निर्माण झाली आहे. सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. हे भाषा, साहित्य व संस्कृतीच्या दृष्टीने हितावह नाही, याकडेही डॉ. शोभणे यांनी आवर्जुन लक्ष वेधले.

आणखी वाचा-मागच्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच! जून कोरडा, जुलैमध्ये प्रमाण वाढले

‘फेसबुकी’ लिखाणातून कालातीत साहित्य कसे निर्माण होणार?

सध्या ‘फेसबुकी’ साहित्याला उधाण आले आहे. ‘ट’ ला ‘ट’ जुळवून कविता केली जाते व ती लगेच ‘फेसबुक’वर टाकली जाते. या ‘इन्स्टंट’ लेखकांना ‘लाईक’, ‘कमेंटस’चा मोह आवरत नाही. एखाद-दुसरा अपवाद सोडला तर या लिखाणाला दर्जा नसतो. तरीही या लिखाणांचे संकलन करून पुस्तके काढली जातात. ती नामवंत प्रशासन संस्था कधीही स्वखर्चाने छापत नाही. मग हे ‘फेसबुकी’ लेखक ती पुस्तके ‘सस्नेह भेट’ असे गोंडस अक्षरात लिहून फुकटात वाटत फिरतात. या अशा ‘फेसबुकी’ लिखाणातून कालातीत साहित्य कसे निर्माण होणार, असा प्रश्नही डॉ. शोभणे यांनी उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scheduled president of the 97th marathi sahitya sammelan dr ravindra sobhanes opinion on government smp 79 mrj