अकोला : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातपुडा पर्वतात दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी धारगडमध्ये यात्रा महोत्सव भरतो. निसर्ग सौंदर्य आणि धार्मिकतेचा सुरेख संगम असलेला हा महोत्सव १० व ११ ऑगस्टला होत आहे. शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड येथे ‘हर हर बोला महादेव’ च्या गजरात हजारो भक्तगण रविवारपासून येथे दाखल झाले.
श्री क्षेत्र धारगड येथे प्राचीन शिवालय असून, हे सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये वसले आहे. समुद्र सपाटीपासून तीन हजार फुट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी असलेल्या चार कोणी गुहामध्ये दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा व कसे निर्माण झाले, याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. या बाबत आख्यायिका मात्र ऐकावयास मिळतात. संपूर्ण वऱ्हाड हे दंडकारण्यात समाविष्ठ होते.
महाभारतकालिन राजकुमार एकलव्य यांच्या पित्याचा दंडकारण्यात अंमल होता. एकलव्य व त्यांचे पिता हे महादेवाचे निस्सीम भक्त होते. त्यांनीच या शिवलिंगांची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे, तर दुसरी आख्यायिका अशी की नरनाळा किल्ल्याच्या सरदाराची पत्नी शिवभक्त होती. तिनेच सरदाराला शिवलिंग स्थापना करायला लावली असेही बोलले जाते. मात्र, याबाबत कुठलाही पुरावा इतिहासात आढळून येत नाही. या गुहेच्या काही अंतरावरच एक लहान भुयार असून येथे एक शिवलिंग व नंदी आहे.
धारगड अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असले तरी धारगडला जाण्याकरिता सोईस्कर मार्ग हा अकोला जिल्ह्यातील अकोटवरून आहे. त्यामुळे धारगड यात्रेचे खरे महत्त्व हे अकोटलाच दिसून येते. धारगडला जाण्यासाठी अकोट आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे अकोटातील रस्ते भक्तांनी फुलून जातात. धारगड हे पूर्वी दुर्गम भागात होते. आता मात्र बसेस सोबत खासगी वाहने सुद्धा धारगड टी पाईंटपर्यंत जाऊ शकतात. श्री क्षेत्र धारगड हे अकोट वरून पाऊल वाटेने जवळपास २५ किमी अंतरावर येत असून प्रमुख मार्गाने ३७ किमी दूर येते. बहुतांश शिवभक्त हे पाऊल वाटेनेच जाणे पसंत करतात.
पूर्णा नदीच्या जलानी भरलेली कावड खाद्यांवर घेऊन भक्तगण अकोटवरून पोपटखेड मार्गाने जातात. डफडीच्या तालावर ‘हर हर महादेव’ असा गजर करीत धारगड येथे पोहचतात व कावडीने आणलेल्या पूर्णा नदीच्या पाण्याने मोठ्या महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करतात. तेथून काही भक्त लहान महादेवावर जातात. यावर्षी सुद्धा हा यात्रा महोत्सव १० व ११ ऑगस्टला उत्साहात होत आहे.
नटलेला मनमोहक परिसर
श्री क्षेत्र धारगड येथे निसर्ग निर्मित धबधबा भक्तांवर जणू जलाभिषेक करतो. निसर्गाने बांधलेली भक्तांची पूजा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखीच असते. सर्वत्र हिरवेगार वातावरण, नद्या-नल्यांमध्ये झुळझुळणारे पाणी, निसर्ग सौंदर्याने नटलेला मनमोहक सूर्या धबधबा व निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू यामुळे भक्तगणांना धारगडचे वेध लागतात.