गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यासह एकूण शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णतः तुटला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी एका आजारी अंगणवाडी सेविकेसाठी दाखवलेली तत्परता पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन घडवणारी ठरली.

भामरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आरेवाडा गावातील अंगणवाडी सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर झाली होती. नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने आणि रस्ते बंद असल्यामुळे त्यांचे प्राण धोक्यात आले होते. याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी समन्वय साधून ‘पवन हंस’ हेलिकॉप्टरची तातडीने मागणी केली.

हेलिकॉप्टरने भामरागड येथे जाऊन सीमाताईंना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात यशस्वीपणे पोहोचवले. त्यांच्या उपचाराला त्वरित सुरुवात करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे.

या कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड, स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे प्रतिनिधी, तसेच पायलट डीआयजी श्रीनिवास व सहपायलट आशिष पॉल यांचे मोलाचे योगदान राहिले.

गडचिरोली पोलिस हे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक नसून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात, याचा हा आणखी एक प्रत्यय आहे. याआधीही पूर, नक्षल हल्ला, अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीत पोलिसांनी वेळेवर मदतीसाठी पुढाकार घेतले आहेत. २०२३ मध्ये आलेल्या पूरस्थितीत पोलिसांनी अनेक गावे स्थलांतरित करतांना जिवाचे रान केले होते. तसेच, काही महिन्यांपूर्वी अतिदुर्गम रासगुंडा येथे जखमी मजुराला हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात पोलिसांचे महत्त्वाचे योगदान होते.

‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भामरागड मध्ये असाच एक प्रसंग समोर आला होता. पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचविण्यात आली होती. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व ‘खाकी’ वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.