अकोला : वीज आणि पाणी याचे विरूद्ध गुणधर्म. दोन्हीचे कधीच जुळत नाही. पावसामुळे उघड्यावरील वीज यंत्रणेला मोठा फटका बसून नेहमीच पुरवठा खंडित होत असतो. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवावर उदार होऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्य करावे लागते. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात गुरुवारी आला. पावसामुळे पिंजर परिसरातील वीज पुरवठा अनेक तासांपासून खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी निर्भयपणे मुसळधार पावसात वीज खांबावर चढले. जोरदार पाऊस कोसळत असतांनाच पिंजर गावठाण वाहिनीची दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरू केला. महावितरण कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे आणि कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. भरपावसात खांबावर चढून दुरुस्ती करतांनाची चित्रफित समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली आहे.
अकोला जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळला. पातूर तालुक्यात तर अतिवृष्टी झाली. पिंजर परिसरात मुसळधार पावसामुळे गावठान वाहिनी नादुरूस्त होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. पिंजर गावातील दोन हजारावर ग्राहक अंधारात गेले होते. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान महावितरणपुढे निर्माण झाले. महावितरणचे कर्मचारी वैभव करपे, धीरजकुमार राऊत, आठवले यांनी अत्यंत जोखीम पत्करत पाऊस सुरू असतांनाच दुरूस्तीला सुरुवात केली. वीज खांबावर चढून दुरुस्ती करावी लागणार असल्याचे लक्षात आले. मुसळधार पावसातच जीव मुठीत घेऊन वीज कर्मचाऱ्यांनी खांबावर चढत तांत्रिक दोष दूर केले. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
अकोला : वीज आणि पाणी याचे विरूद्ध गुणधर्म. दोन्हीचे कधीच जुळत नाही. पावसामुळे उघड्यावरील वीज यंत्रणेला मोठा फटका बसून नेहमीच पुरवठा खंडित होत असतो. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवावर उदार होऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्य करावे लागते. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात गुरुवारी… pic.twitter.com/GfqklqJhpI
— LoksattaLive (@LoksattaLive) June 27, 2025
दरम्यान, पातूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे विश्वमित्रा नदीचे पाणी झरंडी गावात शिरल्याने संपूर्ण गाव जलमय झाले आहे. गावाचा संपर्क तुटला होता. पुराचे प्रमाण कमी झाल्यानंतर गावाशी संपर्क साधता येणार आहे. पुराच्या प्रचंड दाबामुळे गावाला वीज पुरवठा करण्यासाठी असलेले राेहित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शेतातील वीज खांबही पडल्याने झरंडी गावाचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणकडून तातडीने वीज पुरवठा दुरूस्तीच्या कार्य केले जाणार असल्याची माहिती अकोला ग्रामीणचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी दिली.
जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे वीज यंत्रणेवर विपरित परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कार्य सुरू असून मुख्य अभियंता राजेश नाईक आणि अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास परिस्थितीनुसार सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले.