मनमाड – मनमाड ते भुसावळ या रेल्वेच्या अतिशय व्यस्त मार्गावर १४ ते १६ एप्रिल या कालावधीत चाळीसगाव येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. १५ एप्रिल रोजी डाऊन मार्गावर सकाळी सात ते साडेनऊ अडीच तास, अप मार्गावर दुपारी बारा ते अडीच असा अडीच तास तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ तारखेला अप मार्गावर सकाळी सात ते दुपारी साडेबारा असे साडेपाच तास, याप्रमाणे काम होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नाशिक, मनमाड, भुसावळ दरम्यानच्या काही महत्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत.

नाशिक, मनमाड, भुसावळ दरम्यानच्या ११११३ देवळाली- भुसावळ मेमु १५ आणि १६ एप्रिल, ११११४ भुसावळ – देवळाली मेमु १४ आणि १५ एप्रिल, १११२० भुसावळ- इगतपुरी मेमु १५ आणि १६ एप्रिल, ११११९ इगतपुरी – भुसावळ मेमु (१६ आणि १७ एप्रिल), ११०१२ मुंबई-धुळे (१४ आणि १५ एप्रिल), ११०११ धुळे -मुंबई (१५ आणि १६ एप्रिल), ०१२११ बडनेरा-नाशिक रोड मेमु (१४, १५, १६ एप्रिल), ०१२१२ नाशिक रोड – बडनेरा मेमु (१४,१५,१६ एप्रिल), ०१३०७ चाळीसगांव-धुळे आणि ०१३०४ धुळे – चाळीसगाव (१६ एप्रिल) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातून अल्पवयीन बालक, बालिकेचे अपहरण

हेही वाचा – ‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

१६ एप्रिलला डाऊनकडील हजरत निजामुद्दीन गोवा १.३० मिनिटे, साईनगर-शिर्डी कालवा १५ मिनिटे, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा २० मिनिटे, मुंबई-लखनौ १५ मिनिटे थांबवून नियमित केल्या जातील. १६ एप्रिलला अपकडील जम्मू तावी-पुणे ४.१५ तास, गोवा २.२५ मिनिटे. गोरखपूर-लोकमान्यटिळक टर्मिनस १.४५ मिनिटे. दिब्रुगड -लोकमान्य टिळक टर्मिनस १.४० मिनिटे थांबवून नियमित केल्या जातील. १६ एप्रिलला मुंबईहून सुटणार्या लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर, मुंबई-हावडा, लोकमान्य टिळक टर्मनिस- अयोध्या कॅट आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस या गाड्या तीन तास उशिरा मुंबईहून सुटतील तर लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या काही गाड्या वसईरोड दिवामार्गे वळविण्यात येणार आहेत.