जळगाव – राज्यातील कारागृहांमधील धान्य व इतर साहित्य पुरवठ्यात सुमारे ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केल्यानंतर त्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही उडी घेतली आहे. या प्रकरणात सहभागी जळगावमधील कंत्राटदारावर एका मंत्र्याचा वरदहस्त असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, त्याची आता चर्चा आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील जिल्हा कारागृहांमधील धान्य व इतर वस्तुंच्या खरेदी घोटाळ्यात जळगावमधील साई मार्केटिंग कंपनी आणि तिचे संचालक यांचा सहभाग असल्याचा उल्लेख केला आहे. कारागृहातील घोटाळ्यात शेट्टी यांनी ज्या कंपनीचे नाव घेतले, तिचे संचालक हे भाजपशी संबंधित मंत्र्यांचे जळगाव जिल्ह्यातील कट्टर समर्थक मानले जातात. तीच संधी साधून खडसे यांनी मुक्ताईनगरात पत्रकारांशी संवाद साधताना कारागृहांमधील घोटाळ्यावर भाष्य करून कोणाचे नाव न घेता टीका करण्याची संधी साधली. शेट्टी यांनी केलेल्या आरोपाचे समर्थन करताना घोटाळ्यात सहभागी कंत्राटदार एका मंत्र्यांच्या जवळचा आहे. आणि विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबतचे पुरावे आपण सादर करून आवाज उठविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

राजू शेट्टी यांनी जे आरोप केले आहेत, ते जळगाव जिल्ह्यातील एका मंत्रांच्या जवळच्या कंत्राटदारावर आहेत. जळगावच्या कारागृहातही कैद्यांना मिळणारे रोजचे जेवण अतिशय वाईट दर्जाचे असते, याची माहिती आपणास मिळाली. बंद्यांना पुरविले जाणारे अन्न जनावरे सुद्धा खाणार नाहीत, अशीही टीका खडसे यांनी केली. राज्यभरातील पाच ते सहा कंत्राटदारांनी मिळून एक साखळी तयार केली. आणि जिल्हा कारागृहांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न व साहित्य पुरवले. संबंधितांना अनेकांचे राजकीय आशीर्वाद असू शकतात. सरकारमधील कोणी मंत्री त्यांना पाठीशी घालू शकतात. त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.