धुळे: सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल (वरुणावतार) यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत धुळे जिल्ह्यातील सिंधी समाज, पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट आणि भारतीय सिंदु युवा मंच शाखा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी भगवान झूलेलालांविषयी आक्षेपार्ह आणि सांप्रदायिक वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हे वक्तव्य सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, देशभरातील सिंधी समाजात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक आस्थेचा अपमान करणारे असे वक्तव्य अमान्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमित बघेल यांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे. या वेळी पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी, सदस्य गुरु कुमार लच्छनानी तसेच सिंधी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखून, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उदाहरणार्थ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सिंधी समाजाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.