नाशिक – द्वारका चौकातील भुयारी मार्ग हटविणे, वर्दळीच्या चौकातील अगदी वळणावरीस मुंबईनाका बस थांबा स्थलांतरीत करणे, शालिमार चौकातील बस थांबा मागील बाजूला नेणे, महामार्ग स्थानकात बसगाड्यांना आत-बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, अनधिकृत रिक्षा व टॅक्सी थांबे हटवून प्रमुख चौकात रिक्षा थांबे कुठे असावेत याचा अभ्यास आदी सूचना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा आणि पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.

शहरात प्रमुख चौक आणि मार्गावर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे येत आहेत. द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रविवारी महापालिकेने द्वारका परिसरात अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर, सोमवारी आमदार फरांदे यांनी मनपा आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी अधिकाऱ्यांसह द्वारका, सारडा सर्कल, शालीमार आदी भागांतील वाहतुकीचे अवलोकन केले. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी येण्याआधीच या भागातील फेरीवाल्यांना सूचित केले गेले होते. उपरोक्त परिसर मोकळा राहील, याची खबरदारी घेण्यात आली होती. संबंधितांच्या वाहनांचा ताफा अनधिकृत फेरीवाल्यांमुळे काही ठिकाणी अडकत होता. सुरक्षारक्षकांना उतरून रस्ता मोकळा करावा लागला.

प्रमुख चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी करुन फरांदे यांनी यंत्रणेला विविध सूचना केल्या. अनेक ठिकाणी रिक्षा, टॅक्सी अस्ताव्यस्तपणे उभ्या राहतात. त्यांचे अनधिकृत थांबे हटविणे आवश्यक आहे. प्रमुख चौकात कुठे रिक्षा थांबे करता येतील. याचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी मांडली. मुंबई नाका चौकात वाहतूक कोंडी होते. वळणावर मुंबई नाका बस थांबा आहे.

हा थांबा स्थलांतरीत करून वाहतूक सुरळीत करता येईल. महामार्ग स्थानकात सध्या गाड्यांसाठी एकाच प्रवेशद्वाराचा वापर केला जातो. यामुळे कोंडीत भर पडते. ही कोंडी फोडण्यासाठी बस स्थानकात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग करण्याची सूचना फरांदे यांनी केली. द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा वापर होत नाही. सध्या तोच वाहतुकीला अडथळा ठरत असून तो हटवून पादचाऱ्यांना पदपथ उपलब्ध करता येईल. अतिक्रमण हटविल्यानंतर तिथे त्वरित खडीकरण करण्याची गरज असल्याकडे फरांदे यांनी यंत्रणेचे लक्ष वेधले.

अतिक्रमणांवर कारवाई

महापालिकेकडून सोमवारी नाशिक पूर्व विभागातील व्दारका चौक ते अमरधाम रोड, शाहीमार्ग, बागवानपुरा रोड तसेच सारडा सर्कल ते व्दारका दरम्यानच्या भागात अतिक्रमणे आणि अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मनपाचा दैनंदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या भागातील ५५ टपऱ्यांवर कारवाई करीत रस्ता वाहतुकीला मोकळा केल्याचा दावा मनपाने केला. तर अमरधाम शाही मार्गावर पुढील जागा अनधिकृतपणे व्यापणाऱ्या २६ दुकानांवर कारवाई करण्यात आली.