नाशिक – जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात सोमवारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. निफाड तालुक्यात वीज पडून ४० वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर जातेगाव येथे १२ वर्षाचा मुलगा जखमी झाला. चांदवड तालुक्यात कुक्कटपालन केंद्रावर वीज पडून दोन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.

सलग नऊ ते १० दिवस वळिवाच्या पावसाने नाशिकला झोडपले होते. दोन दिवस काहिशी उघडीप घेतल्यानंतर सोमवारी पुन्हा काही भागात तो कोसळला. दुपारी सुकेणे येथे वीज पडून दीपक रहाणे (४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नाशिक तालुक्यातील जातेगाव येथे वीज पडून आदित्य वळवे (१२) हा मुलगा जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे कुक्कटपालन केंद्रावर वीज पडल्याने दोन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या घाट मार्गात पावसामुळे दगड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.