नाशिक – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळा मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ संस्थानकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी दोन वाजता मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून विधिवत पूजा करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात ठेवण्यात येतील. प्रस्थानाच्या मिरवणुकीनंतर टाळ मृदंगाच्या गजरात श्रींचे रथातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पालखी सोहळा हा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेप्रमाणे होणार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी होणार आहेत. वारी मार्गामध्ये त्या सहभागी होतील. वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या पाणी, पालखी तळांवरील निवासाची व्यवस्था, शौचालय, इत्यादी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे.

पंढरपूरपर्यंत यंदा तीन बैलजोड्या रथासाठी असून साधारणतः ३० हजार वारकरी पालखी सोहळ्याबरोबर चालणार आहेत. अहिल्यानगरीतून यात वाढ होणार असून पंढरपूरपर्यंत एक लाख वारकरी निवृत्तीनाथांच्या रथाबरोबर राहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारीचे नियोजन करण्यात आले आहे. वारीचा ज्या गावांमध्ये मुक्काम राहील, त्या ठिकाणी ग्रामपंचायतींना सर्व व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. वारीचा मुक्काम असलेल्या ठिकाणी शुध्द पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, जलरोधक तंबु आदी व्यवस्था करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने करोनाचे सावट पाहता वारीचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी वारकऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. करोनाच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास चाचणीही करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी रवींद्र बागूल यांनी दिली. वारीबरोबर डॉक्टरांचे पथक असलेल्या तीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्याचे सर्वांना वेध लागले आहे. हा पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या मार्गावर ज्या गावांमध्ये पालखीचा मुक्काम असेल, ती गावे स्वागतासाठी कधीच सज्ज झाली आहेत. वारकऱ्यांच्या अपूर्व उत्साहात निघणारा पालखी सोहळा अभूतपूर्व होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न होत आहेत.