उरण : जानेवारीमध्ये कोळीवाडा ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी जेएनपीए बंदरातील मालवाहू जहाजे बंद केल्यानंतर केंद्रीय बंदर मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी जेएनपीएकडून जमीन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. ते पूर्ण करणार असल्याचे लेखी आश्वासन जेएनपीए अध्यक्षांच्या माध्यमातून मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापकाकडून दिले होते. याची जुलै उजाडला तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने येत्या स्वातंत्र्यदिनी चौथ्यांदा जेएनपीए चॅनल बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी १९८५ ला शेवा कोळीवाडा गावाचे विस्थापन केले होते. या संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना धोकादायक घरात आपल्या कुटुंबासह जीवन जगावे लागत आहे. विस्थापित झाल्यानंतर आजपर्यंत चार पिढ्या अशा स्थितीत वास्तव्य करीत आहेत. यात धोकादायक निवाऱ्यासह विस्थापितांच्या रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शेवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासह विविध समस्या, प्रश्न प्रलंबित असल्याने शेवा कोळीवाड्यातील महिलांनी यापूर्वीही मोठा लढा दिला. मात्र प्रशासनाने दाद न दिल्याने विस्थापित महिला संघटनानी जेएनपीएचे बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.

४० वर्षांपासून संघर्ष सुरू

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावाची जमीन संपादन करून त्याचे उरण येथील बोरी येथे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार १७ ऐवजी केवळ २ हेक्टर क्षेत्रातच २५६ कुटुंबांचे १९८५ साली पुनर्वसन करण्यात आले आहे. १९९२ ला हनुमान कोळीवाडा गावातील २५६ घरासह संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे. कमी भूखंडावर पुनर्वसन करण्यात आल्याने अनेक कुटुंबे ही अशाही परिस्थितीत दाटीवाटीने वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे १७ हेक्टर क्षेत्रावरच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मागील ४० वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या काळात आतापर्यंत ग्रामस्थ आणि व्यवस्थापन यांच्यात ५०० हून अधिक बैठका झाल्या. ग्रामस्थांनी खास करून महिलांनी आक्रमक होत जेएनपीए विरोधात संघर्षच सुरू केला आहे. जेएनपीएने गावाच्या पुनर्वसनासाठी विकसित १०.५० हेक्टर जमीन देण्याचे मान्य केले आहे. त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

  • जेएनपीए बंदरात एकूण पाच खासगी बंदर कार्यान्वित आहेत. या बंदरात आयात निर्यात करणारी जगातील २० पेक्षा अधिक जहाजे ये-जा करतात. बंदरातील जहाजे रोखल्यास याचा परिणाम जागतिक व्यापारावर झाला होता.
  • शेवा कोळीवाडा ग्रामस्थांनी जानेवारी २०१२, २०२२ तसेच डिसेंबर २०२३ मध्ये जेएनपीए बंदरात जगातून येणारी व जाणारी मालवाहू जहाजे समुद्रात अडवून आंदोलन केले होते.
  • आंदोलनामुळे सुरक्षा म्हणून बंदरात ये-जा करणारी जहाजे बंद करण्यात आली होती. याचा परिणाम जागतिक स्तरावरील व्यापारावर झाल्याने जेएनपीए प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिले होते.