उरण : १ ऑगस्ट पासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे उरणच्या करंजा,मोरा तसेच अनेक बंदरावर मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र मासेमारी करण्यासाठी लागणारा डिझेल(तेल) अनुदान मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. जो पर्यंत मत्स्यविभागच्या आयुक्तांकडून परवानगी मिळत नाही तो पर्यंत मासेमारी बोटी समुद्रात उतरता येणार नाहीत. तर गेल्या काही महिन्यातील सरकार कडून मिळणाऱ्या तेल( डिझेल ) कोट्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे हजारो मच्छिमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा कोटा सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी मच्छिमारांनी शासनाकडे केली आहे.

मासेमारी करणाऱ्यांना शासनाकडून मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींना वर्षाकाठी ३५ हजार लिटर डिझेल दिले जाते. या डिझेलवर शासनाकडून डिझेल वरील वॅट किंवा लिटर मागे १८ रुपयांची सूट दिली जात आहे. यालाच मच्छिमार डिझेल परतावा असे म्हणतात. हे तेलावरील अनुदान शासनाच्या मत्स्यविभागाने त्याचा कोटा मंजूर केल्या शिवाय मिळत नाही. त्यामुळे महिनाभरा पासून मच्छिमारांना या कोट्याविना मासेमारी करावी लागत आहे. तर मागील दोन ते तीन महिन्याचे डिझेल वरील परतावे ही थकले आहेत. याचा परिणाम मासेमारीच्या नव्या हंगामावर होण्याची शक्यता आहे.

शासनाने पावसाळ्यात दोन घातलेली खोल समुद्रातील मासेमारी बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑगस्ट पासून मासेमारी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत झाल्याने मासेमारी जोमाने सुरू झाली आहे. गेल्या वर्षी पासून १५ ऑगस्ट मध्ये मुंबईतील ससून डॉक ऐवजी उरणच्या करंजा बंदरात सुरू झालेल्या मासळी बाजार सुरु झाला आहे. त्यामुळे बंदी उठाताच खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. तर, स्वस्त दरात मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, कल्याण, अलिबाग, ठाणे येथील व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी हे करंजा बंदरात येत आहेत.

उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. यामध्ये, सुमारे ७०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी असून मासळीची खरेदी- विक्री करण्यासाठी त्यांना मुंबईतील ससूनडॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ६०० मीटर लांबीचे ‘फिशिंग- डॉक’ करंजा येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये, मासेमारी बोटीतील मासळी बंदरात उतरवून त्याच्या खरेदीविक्रीला सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे, नव्याने सुरू झालेल्या ‘करंजा – द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर’ येथे अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी हे घाऊक आणि दैनंदिन गरजेसाठी आवश्यक मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

करंजा बंदरामुळे मुंबईच्या ससून बंदरावर परिणाम : उरणच्या करंजा व मोरा येथील शेकडो मच्छिमार बोटी अनेक वर्षे मुंबईतील ससून बंदरात मासळी विक्री करीत होते. मात्र सध्या या बोटी नव्या करंजा बंदरात मासळीचा व्यापार करीत आहेत. त्यामुळे ससून बंदराच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

एका फेरीसाठी ४ लाखांचा खर्च :

मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या एका बोटीसाठी किमान ४ लाख रुपये खर्च येतो. यात सर्वात अधिक खर्च हा डिझेलचा असतो. अशी माहिती करंजा येथील मच्छिमार नेते रमेश नाखवा यांनी दिली आहे. निम्मा निम्मा नफा : बोट मालक आणि बोटीवर काम करणारे खलाशी व चालक तांडेल यांच्यात खर्च जाऊन मिळणाऱ्या नफ्याचा निम्मा निम्मा वाटा हा समान वाटण्यात येतो.