उरण : तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या उरणवरून अटल सेतूवरून बसने थेट मुंबई गाठता येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून बेस्टकडून या मार्गावरून बस सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अटलसेतूवरून सर्वसामान्यांनाही प्रवास करणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनएमएमटीने या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरुळ ते खारकोपर बसचा मार्ग बदलणार आहे. सध्या नेरुळ ते खारकोपर, उलवे नोड मार्गावर धावणाऱ्या ११५ क्रमांकाच्या बसमार्गात बदल करून ही बस आता नेरुळपासून अटल सेतूमार्गे मंत्रालयापर्यंत चालवली जाणार आहे. नेरुळमधून उलवेमार्गे गव्हाण फाट्यावरून जासई आणि तिथून सागरी सेतूमार्गे ही बस मंत्रालयात पोहोचेल. सध्या या मार्गावरून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच फेऱ्या असतील.

हेही वाचा…१७०० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत – उद्योगमंत्री उदय सामंत

एनएमएमटीकडून बसमार्गांसाठी किमीनुसार तिकीटदर आकारले जातात. त्यानुसार, या मार्गावरील तिकीटदर आकारले जाणार आहेत. या मार्गावरील टोलचा भार प्रवाशांवर पडणार नाही, असाही विचार सुरू आहे. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मुंबईत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतील असा विश्वास एनएमएमटी परिवहन उपक्रमाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात बेस्टच्या बसने उरणमध्ये येऊन येथील ठिकाणाची चाचपणी केली आहे. त्यामुळे उरणमधील नागरिक आणि प्रवाशांची उत्सुकता वाढली आहे. डीवायएफआय या युवक संघटनेने बेस्ट समितीला निवेदन देऊन उरण ते मंत्रालय अशी अटल सेतूमार्गे बस सुरू करण्याची मागणी केली आहे.

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून गणल्या जाणाऱ्या अटल सेतूवरून चारचाकी वाहनांशिवाय प्रवास करता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही या मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना जाता येत नाही. मात्र या पुलाच्या लोकार्पणाला एक महिना पूर्ण होत असतांनाच या पुलावरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट आणि एनएमएमटीकडून बससेवा सुरू करण्याचा विचार आहे.

हेही वाचा…करंजा-रेवस खाडीपुलाच्या बांधकामाची निविदा जाहीर, चार वर्षांनंतर उरणच्या विस्ताराचा महामार्ग मार्गी लागणार

मुंबई शहराला थेट नवी मुंबईशी जोडणारा शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्याच्या भरमसाट टोलमुळे चर्चेत होता. तर थेट समुद्राच्या मध्यातून जाणारा हा पूल असल्याने सर्वसामान्यांना या मार्गाचे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक जण चारचाकी वाहने घेऊन या मार्गावर फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. मात्र सर्वसामान्यांना अद्याप या मार्गावरून जाता येत नाही.

हेही वाचा…खारघर-तुर्भे १० मिनिटांत! लिंक रोड भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात

सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून आता एनएमएमटीने प्रवास करता येणार आहे. या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. नेरूळ ते मंत्रालय व्हाया उलवे नोड – उरण मार्गे अशी ही बससेवा असेल. त्यानुसार या बसचे नियोजन सुरू आहे. सध्या नेरुळ ते मंत्रालय सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनवेळा प्रवासी बस धावणार आहे. त्यामुळे या बसमधून सागरी सेतूवरून प्रवास करण्याचा आनंद सर्वांना घेता येणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmt going to run bus services to mumbai via atal setu psg