नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) च्या फळ बाजारात लिचीच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. बुधवारी (१४ मे) बाजारात १७८ क्विंटल लिचीची आवक झाली असून, सध्या दररोज दोन ते तीन गाड्यांमधून हे रसाळ फळ दाखल होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लिचीला प्रतिकिलो २०० ते ३०० रुपये असा दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सध्या बाजारात प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून लिची येत आहे. हवामान चांगले असल्याने यंदा लिचीचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम दरांवर होऊन ते कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. मुंबईतील किरकोळ बाजारात सध्या शाही लिची आणि चायना लिची यांसारख्या गोड चवीच्या प्रजाती उपलब्ध आहेत, ज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. याव्यतिरिक्त, काही ठिकाणी कसबा लिची, पूरबी लिची आणि अर्ली बेदाना या प्रजातीही मर्यादित प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही लिचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. व्हिएतनाममध्ये यंदा उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली असून, जागतिक मागणीही अधिक आहे. एका जागतिक संस्थेच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये लिची बाजाराचा आकार २.३६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून, पुढील काही वर्षांत तो ४.२५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी वाढलेली जागरूकता, उष्ण कटिबंधीय फळांची लोकप्रियता आणि आशिया-पॅसिफिकमधील वाढती खरेदी क्षमता ही लिचीच्या वाढत्या मागणीची प्रमुख कारणे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः अन्न व पेय, औषधनिर्माण आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगांमध्ये लिचीचा वापर वाढत असल्याचे दिसून आले आहे.

एपीएमसीतील घाऊक फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले की, सध्या बाजारात येत असलेल्या लिचीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जसा हंगाम पुढे जाईल, तशी लिचीची उपलब्धता वाढेल आणि दरात स्थिरता येईल.

लिची खरेदी करताना

व्यापारी लिची खरेदी करताना फळाचा ताजेपणा, रंग आणि गोडसर चव तपासून घेण्याचा सल्ला देतात. ताज्या लिचीची साल चमकदार आणि गडद लालसर रंगाची असते, तसेच फळाला सौम्य सुगंध असतो.

ब्लर्ब

सध्या बाजारात प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून लिची येत आहे. हवामान चांगले असल्याने यंदा लिचीचे उत्पादन समाधानकारक आहे.