बेलापूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेलापूर. बेलाच्या झाडांची मुबलकता असलेले गाव. नवी मुंबईतील सीमेवरील गाव. पण कधी काळी हे गाव रायगड जिल्ह्य़ात होते. पनवेल साष्टी तालुक्यात हे गाव मोडत होते. नवी मुंबईची ओळखच मुळात या गावच्या नावावरून. जुने नाव मांजरपाडा. दिवाळे, शाहाबाज, आग्रोली आणि बेलापूर हे चार पाडे. त्यांची मिळून बेलापूर- शाहाबाज ग्रामपंचायत. त्यातून नंतर बेलापूर वेगळे झाले. त्या काळी गावात सर्व प्रकारचा व्यापार होत होता. पंचक्रोशीतील बाजारपेठ अशी या गावची ओळख. आठवडी बाजार म्हणजे एकप्रकारची जत्राच. पहिली शाळा, पहिला टेलिफोन, पहिला दवाखाना, पहिली टुरिंग टॉकीज असे बरेच काही ‘पहिले’ या गावाच्या नावावर आहे.

तालुका वा जिल्ह्य़ाचा कोणताही दर्जा नसताना पेशवेकालीन बेलापूर गावात ब्रिटिशांनी येथे न्यायालय आणि तुरुंग बांधला होता. ठाण्याहून संध्याकाळी सुटणारी एसटी रात्री मुक्कामाला राहून सकाळी सुटायची. बाजारपेठ असलेल्या गावाची गरज मात्र एका खासगी वाहतूकदाराने भागवली होती. मात्र सकाळ-संध्याकाळ ये-जा करणारी एसटी एवढीच काय ती शासकीय वाहतुकीची व्यवस्था. गावाच्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण या तीन बाजूने समुद्र, खाडी, मिठागरे आणि उत्तर बाजूला हिरवागार डोंगर, वनराई अशी निसर्गसंपन्न बेलापूर गावात तीन चित्रपटांचे चित्रीकरण देखील झाले आहे. त्यातील जिंदगी चित्रपटात गावातील अनेकांनी भाग घेतला होता.

ठाणे-बेलापूर पट्टी असे १९७० पर्यंत असलेला हा ठाणे खाडीपलीकडील भूभाग एका दिवसात शासनाने नवी मुंबई केला. मुंबईला पर्याय ठरणारे शहर वसविण्याचा निर्णय झाला. त्या ठाणे जिल्ह्य़ाच्या शेवटच्या टोकावर वसलेले बेलापूर गाव. त्यामुळेच या भागाला ठाणे-बेलापूर पट्टी असे म्हटले जात होते. पुणे गोव्याहून आल्यानंतर मुंबईच्या वेशीवर लागणारे नवी मुंबईतील पहिले गाव. पालिका क्षेत्रातील २९ गावांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारे त्यावेळचे हे गाव. त्यावेळी उत्तर बाजूस म्हणजे आत्ताच्या पारसिक हिल भागात बेलाची झाडे आढळून येत असत. गावाच्या वेशीवरील हा दोन हजार एकर वने व ३५० एकर गुरचरण (शासकीय) भागात त्यावेळी बरीच निर्सगसंपदा होती. याच जंगलात त्यावेळी बेलाची झाडे आढळून येत होती. त्यावरून या गावाला बेलापूर असे नाव पडल्याची आख्याखिका आहे. पाचशे लोकवस्तीचे हे गाव आता दहा हजारांपेक्षा जास्त वस्तीचे झाले आहे. गावाच्या जवळ असलेला पेशवेकालीन बेलापूर किल्ला आणि काही बुरुजांमुळे या गावाची दोन भागांत विभागणी केली गेली आहे. पूर्व भागात लोकवस्ती आणि पश्चिम भागात सागरी व्यापार उद्योग. बेलापूरला असलेला विस्र्तीण असा सागरी किनारा पाहता या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यांतून व्यापारउदीम केला जात होता. जसे हे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या व्यापाराचे बेट होते. तसेच तो मुंबईमधील स्मगलरांचा हक्काचा किनारा होता. गावाच्या पूर्व बाजूस सात एकरवरचा तलाव आजही गावाची शान आहे. शहरीकरणात तो आता कमी करण्यात आला आहे. या तलावात जत्रेच्या काळात पोहण्याच्या स्पर्धा होत होत्या. तलावाजवळच श्रीशंकराचे जागृतेश्वर मंदिर आहे. मंदिराचा गाभा क्षेत्र तलावापेक्षा पाणी पातळीपेक्षा खाली आहे. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या या शिवकालीन शिवमंदिरात बाजूच्या तलावाचा एक थेंब पाणी कधी घुसल्याचे ऐकिवात नाही. याच जागृतेश्वराला वाहण्यात येणारी बेलाची पाने मुबलक प्रमाणात या ठिकाणी मिळत होती. आज बेलापूर गाव आहे पण बेलाची पाने शहरीकरणाच्या या धबगडय़ात नामशेष झाली. गावात बारा बलुतेदारांची वस्ती असल्याने गाव कसे गुण्या गोविंदाने नांदत होते. केवळ बारा जातीचीच नव्हे तर धर्माची देखील मंडळी गावात होती. त्यामुळे पंचशील लोकवस्तीचे गाव अशी बेलापूरची एक नवी ओळख होती. चैत्र नवमीला रामनवमीच्या निमित्ताने होणारी जत्रा या गावचीच नाही तर संपूर्ण बेलापूर पट्टीची जत्रा ठरायची. चार-पाच हजार जत्रेकरूंचा जत्था या काळात बेलापूर मध्ये लोटायचा. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गावातील अनेक रहिवाशी मोठय़ा आवडीने करीत होते. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल असा ‘मेला’ या गावात त्यावेळी लागत होता. कुस्ती आणि पोहण्याच्या स्पर्धा हा जत्रेचे मुख्य आर्कषण. कीर्तन, भजनात तर अख्ये गाव भक्तीमय होत होते. कपडे, शोभेच्या वस्तू, खेळणी याचबरोबर रॉड्रिक्स ऑगस्टीनच्या टुरिंग टॉकीजमध्ये एखाद्या चित्रपटाची मजा लुटली जात होती. अनेक मंदिराच्या स्थापनेमुळे धार्मिक परंपरा सांभाळणाऱ्या या गावाने दीडशे वर्षांपूर्वीच शैक्षणिक चळवळ उभारलेली आहे. बेलापूर पट्टीतील पहिली प्राथमिक मराठी शाळा इंग्रजांनी या गावात जून १९६५ रोजी सुरू केली. ठाण्याकडील खैरणे-बोनकोडय़ापासून ते उरण-पनवेलच्या कोपरा गावापर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिकण्यास येत होते. विशेष म्हणजे उलवा भागातील काही विद्यार्थी होडीने समुद्र पार करून या शाळेत हजेरी लावत होते. विद्या प्रसारक हायस्कूलच्या ओटय़ापर्यंत समुद्राचे पाणी लागत होते. आज त्याच पाण्यावर सीबीडी शहर उभे राहिले आहे. सिडकोचे रेस्ट हाऊस ज्या ठिकाणी उभे आहे. त्या किल्ले गावठाण परिसरात इंग्रजांचे फौजदारी न्यायालय, पोलीस कोठडी, फाशी देण्याचे ठिकाण, कस्टमचे कार्यालय होते. ब्रिटिशकालीन हा ऐतिहासिक ठेवा काही वर्षांपूर्वी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही मागच्या पुढचा विचार न करता जमीनदोस्त केला. त्यामुळे या गावाची एक साक्षीदार असलेली  इमारत नेस्तनाबूत झाली आहे. याच किल्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर होणारी तस्करी आणि व्यापार यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कस्टमने बोटीने प्रवास सहज करता यावा म्हणून बांधलेल्या समुद्राच्या पाण्यात उतरणाऱ्या पायऱ्या आजही शाबूत आहेत. याच भागात गोडय़ा पाण्याच्या दोन विहिरी असून पूर्व भागातही तीन विहिरी होत्या. त्यामुळे गावातील मुले पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत होते. विहीर, हौदात होणारा पोहण्याचा सराव नंतर जवळच्या समुद्रात लीलया केला जात होता. बेलापूर गाव जरी ४५ एकरवर वसले होते तरी मिठागरे, शेती यांचा परिसर ४५० एकर पेक्षा जास्त होता. आज जेथे सेट्रंल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) म्हणून संपूर्ण शहर आणि कोकणाचा कारभार हाकला जातो. त्या सिडको, पालिका, कोकण भवन, पोलीस, कोकण रेल्वे, र्झिव्ह बँक याच्या काही टुमदार इमारती या बेलापूरकरांच्या जमिनींवरच उभ्या आहेत तर काही खारजमिनीवर. महात्मा गांधीच्या दांडी यात्रेसह अनेक आंदोलनात सहभागी होणारे या गावातील पाच-सहा तरुणांना स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही काम केले आहे. पण त्यांना तसे ताम्रपट हाती पडले नाही. जिवंत आणि चैतन्यमय असणाऱ्या या गावातील राजकीय कारकीर्द टप्प्याटप्प्याने बहरली आहे. काँग्रेसच्या पंढरीनाथ पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यापर्यंत धडक मारली तर गावची सून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे भाजपाच्या तिकिटावर विधानसभेत धडकल्या. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गावाने बेलाच्या पानाप्रमाणे आपली ‘वाहून’ घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekly market village belapur