पालघर: पालघर जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी ऐन पावसाच्या तोंडावर खोदकाम केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला असून यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून रस्त्यावर माती पसरल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्खनन केल्यानंतर रस्त्याची परिस्थिती पूर्ववत करण्यास संबंधित ठेकेदार अपयशी ठरला असून याबाबत महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. महावितरण कंपनीने अल्याळी येथे उभारण्यात येणाऱ्या विद्युत उपकेंद्र जोडणी देण्यासाठी केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम करून खोलवर केबल टाकणे अभिप्रेत आहे.
पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गोठणपूर नाक्यापर्यंत केबल टाकण्याचे काम सध्या सुरू असून या रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी मालकी जमिनी तर इतर काही ठिकाणी झालेले अतिक्रमण यामुळे नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने गेल्या आठवड्यात रस्ता उखडण्याचे काम केले. केबल टाकण्याचे काम रात्रीच्या वेळी करण्यात आल्यानंतर त्यावर माती अंथरूण संबंधित ठेकेदार पुढील कामामध्ये व्यस्त झाला. दरम्यानच्या काळात पालघर मध्ये मुसळधार पाऊस झाल्याने खोदकाम केलेली माती रस्त्यावर आल्याने रस्ता निसरडा झाला असून अनेक दुचाकीस्वार त्यावरून सरकून पडण्याचे अपघात घडले आहेत. शिवाय रस्त्याची रुंदी कमी झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या भागात खाजगी शाळा असून शाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता पूर्ववत न झाल्यास कोंडीच्या अधिक गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता केबल खोदकाम करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचित करण्यात आले न्हवते. या कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या बदल्यात दुरुस्ती रक्कम भरणे अपेक्षित असून ती आजवर जमा न केल्याने दुरुस्तीचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याचे त्यांनी स्पष्ट करण्यात आले.
या संदर्भात महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांच्याशी संपर्क साधला असता केबल टाकण्याच्या कामात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष झाले असल्यास संबंधित ठेकेदाराला सांगून रस्त्याचे काम पूर्ववत करू असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.
माहीम वासियांचा प्रवास पाण्यातूनच कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही
पालघर माहीम रस्त्यावर सुंदरम नाक्याजवळ मलमूत्र मिश्रित पावसाचे पाणी साचू लागल्याने नागरिकांची पुन्हा मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. माहीम ग्रामपंचायत हद्दीतील सुंदरम नाक परिसरात असणाऱ्या इमारतींमधून निघणारे घरगुती सांडपाण्याचे निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने पालघरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रस्त्यावरील पाणी वाहून नेण्यासाठी उभारलेली गटार व्यवस्था याच परिसरात संपत असल्याने माहीम मार्गावर सांडपाणी पाणी साचत होते. याबाबत लोकसत्ता मध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर परिसरात एका मोकळ्या जागेत हे पाणी वळवण्यात आल्याने हा प्रश्न तात्पुरता सुटला होता.
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्व मान्सूनच्या जोरदार सरी झाल्याने या भागात पुन्हा पावसाचे पाणी साचले असून त्यामध्ये घरगुती सांडपाण्याचे देखील मिश्रण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या विविध गृहसंकुल मधील रहिवासी व माहीम केळवा गावातील ग्रामस्थांना या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोपट चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीचे काम ज्या ठिकाणी निधी अभावी थांबवले त्या ठिकाणापासून पाण्याचा योग्य निचरा होईल अशा नैसर्गिक ओहळापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांच अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे असे सांगितले. या अंदाजपत्रकाला सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्यामार्फत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर माहीम रस्त्यावर साचणारे सांडपाणी सुरू होणाऱ्या पावसाच्या हंगामात कायम राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.