-
विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नऊ सदस्यांचा निरोप समारंभ हास्यविनोद, राजकीय टोलेबाजी आणि अनुभवकथनातून चांगलाच रंगला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रवींद्र फाटक, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यात संपत आहे. त्यांना विधान परिषदेत बुधवारी निरोप देण्यात आला.
-
यावेळी निरोपाच्या भाषणात बोलताना प्रसाद लाड यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली. तसंच हमाली करण्यापासून ते आमदार होण्यापर्यंतचा संघर्ष सांगितला.
-
मी एका गरीब घरातील मुलगा आहे. माझे वडील माझगाव डॉकमध्ये कामगार होते. रावते, देसाई यांच्यासोबतचे १९६८ सालातील ते शिवसैनिक होते असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
-
रावतेंचा मुलगा माझा वर्गमित्र होता. देसाईंचा मुलगा ज्युनिअर होता. आजही मी त्यांना काका म्हणतो असंही लाड म्हणाले.
-
“परळमध्ये छोट्याशा खोलीत राहायचो. तिथून आयुष्याला सुरुवात झाली,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
-
“कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमप्रकरण सुरू झालं. माझ्या पत्नीचे वडील बाबुराव भापसे विधानपरिषद सदस्य होते. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेचे आमदार राहिले. त्यावेळी त्यांचा मुंबईमधला रुबाब जेव्हा पाहायचो, त्यावेळीच ठरवलेलं की आयुष्यात एकदा तरी आमदार व्हायचं,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
-
तो रुबाबच एवढा असायचा की पोलीस सलाम करतात, कार्यकर्ते दारात येतात आणि सामाजिक बांधिलकीतून कामं होतात असं प्रसाद लाड म्हणाले.
-
वयाच्या १९व्या वर्षी आपण विधानपरिषद सदस्याच्या मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केला होता, असं प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितलं.
-
बाबुराव भापसेंच्या मुलीला पळवून नेऊन लग्न करणं त्यावेळी मुंबईत फार मोठी गोष्ट होती असंही ते म्हणाले.
-
“लग्नासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण असल्याची अट होती. मी १९व्या वर्षी लग्न केलं आणि २१ व्या वर्षी मुलगी झाली,” असं प्रसाद लाड म्हणाले.
-
“खिशात पैसे नव्हते. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियात मी हमाली करायचो. त्याचे ७० रुपये मला मिळायचे. त्यापैकी ४० रुपये बायकोला द्यायचो आणि ३० रुपयांनी विद्यार्थी काळातलं राजकारण करायचो. अशाप्रकारे संघर्षातून सगळं मिळवलं,” अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
-
“राजकारणात शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी जी संधी दिली, त्या संधीचं मी सोनं केलं,” असं ते म्हणाले.
-
“जयंत पाटलांमुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी ३१ व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ हे तिथे विश्वस्त होते,” असं त्यांनी सांगितलं.
-
शरद पवारांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलो असता ते रागावले होते असं प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितलं.
-
“आम्ही तझ्यावर कुटुंबासारखं प्रेम दिलं, म्हाडाचं अध्यक्ष केलं जे मुंबईतील फार मोठं राजकीय पद आहे, पण तू आम्हाला सोडून गेलास,” असं शरद पवार म्हणाले होते असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
-
त्यावर मी त्यांना “साहेब तुम्हाला अभिमानही वाटला पाहिजे. भाजपासारख्या एका मोठ्या पक्षात जाऊन मी माझं स्थान निर्माण करत फडणवीसांच्या शेजारी बसण्याइतपत किंमत घडवली. हे कदाचित तुमच्या शिकवणीमुळे असेल आणि फडणवीसांनी जी साथ दिली, त्याच्यामुळे असेल” असं म्हटलं असल्याचं लाड म्हणाले.
-
दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व सदस्यांची कामगिरी, अनुभव आदींबाबत विवेचन केले. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे ‘लाड कुणी केले आणि त्यांनी प्रसाद कुणाला दिला’, हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे, अशी मिश्कील टिप्पणी यावेळी त्यांनी केली.
-
प्रसाद लाड यांनी यावेळी सभागृहाचे आभार मानत निरोप घेतला.
-
(Photos: Prasad Lad Twitter)
PHOTOS: …अन् मी आमदाराच्या मुलीला पळवून नेऊन लग्न केलं; प्रसाद लाड यांनी सभागृहात सांगितला सगळा किस्सा
निरोपाच्या भाषणात बोलताना प्रसाद लाड यांनी हमाली करण्यापासून ते आमदार होण्यापर्यंतचा संघर्ष सांगितला
Web Title: Bjp mla prasad lad shares his journey and love story in vidhan parishad sgy