-
गुरुवारी सकाळी मीरारोडमधील एका हत्या प्रकरणाने खळबळ उडाली. एका फ्लॅटमध्ये महिलेच्या मृतदेहाचे १३ ते १४ तुकडे सापडल्याने पोलीसही चक्रावले!
-
गुरुवारी मीरारोडच्या गीतानगर भागातील दीप इमारतीमधून पोलिसांना फोन आला. सातव्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.
-
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आधी आसपास चौकशी केली आणि नंतर थेट घराचं कुलूप तोडण्याचा निर्णय घेतला.
-
घराचं कुलूप तोडल्यानंतर आत जाताच समोरचं दृश्य पाहून पोलीसही काही काळ चक्रावले. एका मृतदेहाचे अनेक तुकडे पोलिसांना त्या घरात सापडले!
-
सगळ्यात आधी पोलिसांना पाय सापडले. पण धड आणि शीर कुठे दिसत नव्हतं. घराच्या आतल्या बाजूला शोध घेतला असता धड आणि शीराचे तुकडे पोलिसांना सापडले.
-
शीर आणि धडाचे तुकडे कापून एक बादली आणि एका पातेल्यात लपवून ठेवले होते. हे तुकडे कुकरमध्ये शिजवलेले आणि गॅसवर भाजलेले दिसत होते.
-
मृतदेहाचे काही तुकडे तर मिक्सरमध्ये घालून बारीक केल्याचं जाणवत होतं. हा सगळा प्रकार पाहून ही एक निर्घृण हत्या असल्याची पोलिसांची खात्री पटली. अधिक तपास केल्यावर काही प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली.
-
या फ्लॅटमध्ये ५६ वर्षीय मनोज साने आणि ३२ वर्षीय सरस्वती वैद्य हे गेल्या १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. पण काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद चालू होते.
-
सरस्वतीच्या चारित्र्यावर मनोज सानेला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. या वादाला कंटाळूनच सरस्वतीनं विष पिऊन आत्महत्या केल्याचा एक अंदाज बांधला जात आहे.
-
मात्र, दुसरीकडे सरस्वतीनं स्वत: विष प्यायलं की तिला पाजलं गेलं, याबाबत खातरजमा होऊ शकलेली नाही. या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
-
सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजनं भयंकर मार्ग शोधला. आधी ट्री कटरच्या साहाय्याने त्यानं मृतदेहाचे तुकडे केले. मग ते कुकरमध्ये शिजवले, काही गॅसवर भाजले तर काही मिक्सरमध्ये छोटे केले.
-
हळूहळू घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या एका गटारात मनोजनं यातले काही तुकडे फेकल्याचं पोलिसांना समजलं. यासाठी त्यानं वापरलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
-
पोलिसांनी मनोजचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. मात्र, ही हत्या की आत्महत्या? हत्या असेल, तर त्यामागचं कारण काय? सरस्वतीचा मृत्यू नेमका कधी झाला? या प्रकरणात आणखीन कुठला पैलू आहे का? हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.
-
शेजाऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलंय. “मी तीन वर्षे त्यांच्या शेजारी राहतो आहे पण त्यांचं नाव काय ते पण मला माहित नव्हतं. कुठल्याही सणासुदीलाही ते बाहेर पडायचे नाहीत, ते कुणातही मिसळत नव्हते”, असं या शेजाऱ्यानं सांगितलं.
-
“सोमवारी मला त्यांच्या घरातून वास येऊ लागला. मला वाटलं की उंदीर मेल्यामुळे वास येतील. आपल्या घराच्या शेजारी अशी काही हत्या वगैरे झाली असेल हे तर आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. आम्ही असं हत्याकांड, खुनाचे प्रकार हे सगळे टीव्ही सीरीयल्समध्ये पाहिले आहेत”, असंही शेजाऱ्यानं सांगितलं.
-
मला वास आल्यानंतर मी साने यांना सांगितलं. त्यांच्या घराला अर्धावेळ तर कुलुप असायचं. मंगळवारी मी आल्यानंतर वास खूप मोठ्या प्रमाणावर आला. मी त्यांना बोलवायला गेलो. दार वाजवलं. पण काहीही प्रतिसाद आला नाही. मग मी थोडावेळ थांबलो तर मला रुम फ्रेशनरचा वास आला, असंही तो म्हणाला.
-
आम्हाला मनोजच्या घरात सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे सापडले. सरस्वती आणि मनोज हे दहा वर्षांपासून एकत्र राहात होते. सरस्वती अनाथ होती तिला कुणीही नातेवाईक नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
सरस्वतीचं शिक्षण १० वीपर्यंत झालं होतं. ३ पातेली, दोन बादल्या आणि कुकर यामध्ये मृतदेहाचे तुकडे होते. ४ जूनपासून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कापत होता. या घटनेनंतरही आरोपी मनोज त्याच घरात राहात होता. किचनमध्ये तुकडे शिजवत होता आणि जेवायला बाहेर जात होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
-
मनोज आणि सरस्वती हे दोघे अनाथ होते. मनोज साने हा पंधरा वर्षांपूर्वी बोरीवली येथील एका किराणा दुकानात नोकरीला होता.यावेळी सरस्वती त्याच्याकडे साहित्य खरेदी करण्यासाठी येत होती. तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली.
-
मनोजला देखील कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील पंधरा वर्षांपासून ते लिविंग रिलेशनशिपमध्ये राहत होते.
-
या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
-
“मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठ्ठ्या ताई…”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असून काही महिन्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाशी याची तुलना केली जात आहे.
-
दिल्लीतील हत्या प्रकरणातही आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली होती.
भयानक… ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि…; काय आहे मीरारोड हत्या प्रकरण?
मीरारोडमध्ये एका व्यक्तीने लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे कापून गॅसवर शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! (फोटो – एएनआय/लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Web Title: Mira road murder case mumbai accused manoj sane chopped dead body live in partner saraswati vaidya pmw