-
सर्वात प्रथम स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी (७३) आहेत. मागच्या काही महिन्यांमध्ये जी२० शिखर परिषद, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा अशा काही प्रमुख कार्यक्रमामुळे त्यांची प्रसिद्धी पुन्हा एकदा शिखरावर आहे. तसेच आगामी लोकसभेसाठी ‘अब की बार, ४०० पार’ असा नारा देऊन पंतप्रधानपदाची हॅटट्रिक मारण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
-
दुसऱ्या स्थानी आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (५९). निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या अमित शाह यांनी नुकताच मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाला विजय मिळवून दिला. तसेच भाजपाला दक्षिणेतील राज्यात सत्ता मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नुकतेच त्यांनी तीन फौजदारी कायदे रद्दबातल ठरवून नवे कायदे मंजूर करून घेतले.
-
तिसऱ्या स्थानावर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (७३). २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यावरुनच देशाला एक संदेश दिला गेला. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी संघाचा महत्त्वाचा वाटा याहीवेळेस असेल, असे सांगितले जाते.
-
चौथ्या स्थानी आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (६४). मागच्या काही काळात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाच्या विषयांचा निपटारा केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने हरकत घेतलेली नाही. त्यामुळे सरकारचा विजय झाला. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणूक रोखे योजना अवैध घोषित करून चंद्रचूड यांनी सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला.
-
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (६९) पाचव्या स्थानावर आहेत. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणे, तसेच रशियातून इंधन आयात करणे. कॅनडामध्ये झालेली निज्जरची हत्या, त्यानंतर अमेरिकेची नाराजी.. अशा अनेक आघाड्यांवर एस. जयशंकर यांनी आपले राजनैतिक वाटाघाटीचे कौशल्य दाखवून दिले.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (५१) हे सहाव्या स्थानी आहेत. ८० लोकसभा मतदारसंघ असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ यांची निवड झाली. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य निर्माण करायचे आहे, असा निर्धार ते व्यक्त करतात.
-
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (७२) सातव्या स्थानावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून सिंह काम करत आहेत. सशस्त्र दलात नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी गेल्या काही काळात त्यांनी काम केले आहे.
-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (६४) या आठव्या स्थानावर आहेत. भारताच्या सर्वाधिक काळ अर्थमंत्री पद भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत.
-
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (६३) नवव्या स्थानी आहेत. पंतप्रधान मोदी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात योग्य समन्वय ठेवून संघटनेचा अध्यक्ष या नात्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
-
दहाव्या स्थानी उद्योगपती गौतम अदाणी (६१) यांचा क्रमांक लागतो. १०१ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अदाणी भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पायाभूत सुविधा, ऊर्जा, विमानतळ, माध्यम अशा विविध क्षेत्रात त्यांनी उडी घेतली आहे.
-
त्यांच्या खालोखाल अकराव्या स्थानी आहेत, रिलायन्स ग्रुपचे प्रमुख मुकेश अंबानी (६६). १०९ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
-
काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे दावेदार समजले जाणारे राहुल गांधी (५३) हे सोळाव्या स्थानी आहेत. मागच्या वर्षी भारत जोडो न्याय यात्रा काढून राहुल गांधी यांनी स्वतःची प्रतिमा नव्याने तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश आले. मात्र यात्रेचे दुसरे पर्व त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. या यात्रेमुळे इंडिया आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत.
-
विशेष म्हणजे या यादीत ईडीचे संचालक राहुल नवीन (५६) यांचेही नाव आहे. ते ३० व्या क्रमाकांवर आहेत. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात माजी संचालक संजय मिश्रा निवृत्त झाल्यानंतर राहुल नवीन यांची निवड झाली. मुख्यंमत्री हेमंत सोरेन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिग्गज राजकीय नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धासड राहुल नवीन यांनी दाखविले.
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (वय ६०) ४८ व्या क्रमाकांवर आहेत. शिवसेनेतून बाजूला होऊन शिंदे यांनी पक्षच ताब्यात घेतला. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच बदलली. शिंदे एनडीएत सामील झाल्यामुळे भाजपाची राज्यातील स्थिती आणखी मजबूत झाली. शिंदे यांच्या खाली ५० व्या क्रमाकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
-
महाराष्ट्रासह देशातील सर्वात अनुभवी नेते म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार ( वय ८३) ९४ व्या क्रमाकांवर आहेत. त्यांच्या खालोखाल ९५ व्या क्रमाकांवर उद्धव ठाकरे आहेत.
देशातील प्रभावशाली व्यक्ती कोण? १०० जणांच्या यादीत ईडीचे संचालक महाराष्ट्रातील नेत्यांच्या पुढे
लोकसभा निवडणुकीला काही आठवडे उरले असताना द इंडियन एक्सप्रेसने भारतातील १०० प्रभावी नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपाच्या नेत्यांचा अधिक भरणा असल्याचे दिसत आहे. तर महाराष्ट्रातील काही मोजक्याच नेत्यांचा या यादीत समावेश दिसतो. (सर्व फोटो – Express File Photo)
Web Title: The list of most powerful 100 indians ed acting director rahul navin ahead of maharashtra leader kvg