केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (३१ डिसेंबर २०२३) साध्वी ऋतंभरा यांची भेट घेतली आहे. वृंदावन येथे जेऊन अमित शाह यांनी ऋतंभरा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर या साध्वी ऋतंभरा कोण आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम मंदिर आंदोलनादरम्यान ऋतंभरा यांची घरोघरी चर्चा

तीन दशकांपूर्वी उत्तर भारतात साध्वी ऋतंभरा हे नाव चांगलेच चर्चेत होते. राम मंदिर आंदोलनादरम्यान तरुण असलेल्या साध्वी ऋतंभरा यांची उत्तरेकडील राज्यांत घराघरांत चर्चा व्हायची. त्यांच्या शुद्ध हिंदीतील भाषणांच्या ऑडिओ कॅसेट्स ठिकठिकाणी ऐकवल्या जायच्या.

ऋतंभरा संघ परिवारासाठी महत्त्वाच्या

राम मंदिर आंदोलनानंतर ऋतंभरा फारशा चर्चेत नाहीत. त्या सध्या वृंदावनमध्ये स्थायिक आहेत. येथे त्या छोटी मुले, विधवा महिला, तसेच वयोवृद्धांसाठी आश्रम चालवतात. रविवारी ऋतंभरा यांचा ६० वा वाढदिवस होता. त्यानिमित्त सध्या फारशा चर्चेत नसलेल्या ऋतंभरा यांची अमित शाह यांनी वृंदावनमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. अमित शाह यांच्या या भेटीमुळे संघ परिवारासाठी ऋतंभरा या अजूनही किती महत्त्वाच्या आहेत, हे अधोरेखित झाले आहे.

ऋतंभरा मूळच्या पंजाबच्या

साध्वी ऋतंभरा यांचा पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील दोराहा येथे जन्म झाला. साध्वी होण्याआधी त्यांचे नाव निशा असे होते. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी हरिद्वार येथील स्वामी परमानंद गिरी यांना गुरू मानत संन्यास स्वीकारला. १९८० साली विश्व हिंदू परिषदेने जन जागरण अभियान सुरू केले होते. त्यात राम मंदिर आंदोलनाचाही समावेश होता. या अभियानात ऋतंभरा भाषण करायच्या. त्यामुळे त्या काळात त्या चर्चेत आल्या होत्या.

विश्व हिंदू परिषदेच्या अभियानास मदत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्रीय सेविका समितीशी ऋतंभरा निगडित होत्या. विश्व हिंदू परिषदेच्या जनजागरण अभियानाला मदत करण्यासाठी तेव्हा ऋतंभरा समोर आल्या होत्या. या काळात काँग्रेस पक्षाचा सगळीकडे बोलबाला होता. तर त्याच १९८४ च्या काळात भाजपा कठीण काळातून जात होती. १९८४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाचा फक्त दोन जागांवर विजय झाला.

भाषणासाठी हवा होता चेहरा

“जनजागरण अभियानादरम्यान गंगामाता भारत माता यात्रा काढण्यात आली. त्या यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी भाषणे आयोजित करण्यात आली होती. त्या काळात लोकांच्या मनाचा ठाव घेणारे वक्ते हवे होते. साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती या उत्तम वक्त्या होत्या. त्यामुळे या काळात ऋतंभरा आणि उमा भारती यांना ठिकठिकाणी भाषणे करण्याची संधी देण्यात आली,” अशी माहिती संघाशी संलग्न असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाचे माजी संपादक शेषाद्री यांनी दिली.

१९९२ पर्यंत ऋतंभरा चर्चेत

१९९०-९२ च्या काळात राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान ऋतंभरा चांगल्याच चर्चेत होत्या. मात्र, १९९२ नंतर त्या गायब झाल्या. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

१९९५ साली अटक

ऋतंभरा यांना १९९५ साली ख्रिश्चन धर्माविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ११ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या बाहेर आल्या होत्या.

वृंदावनमध्ये वात्सल्यग्राम

दरम्यान, गेल्या तीन दशकांत ऋतंभरा फारशा चर्चेत नाहीत. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईजवळ एक आश्रम सुरू केला होता. मात्र, नंतर त्या वृंदावनमध्ये स्थायिक झाल्या. तेथे त्या वात्सल्यग्राम नावाने आश्रम चालवतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah meets sadhvi ritambhara in vrindavan know who is sadhvi ritambhara prd