हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अचूक राजकीय संदेश दिला आहे. या यात्रेला “भारत न्याय यात्रा” असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यातून या यात्रेद्वारे काँग्रेसचे उद्दिष्ट स्पष्ट होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरमधील जातीय हिंसाचार अजूनही थांबलेला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदाही या राज्याचा दौरा केलेला नाही. मणिपूरच्या हिंसाचाराच्या मुद्द्याच्या हाताळणी वरून विरोधकांनी केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा प्रस्तावही केंद्राने फेटाळला होता. त्यामुळे भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात करून काँग्रेसने आणि इंडियाने ही भाजप आणि केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये इंडियाच्या खासदारांचे सामूहिक निलंबन केल्यानंतर विरोधकांना संसदेबाहेरच लढाई लढावी लागणार आहे. ही लढाई मणिपूरमधून सुरू होणार असेल तर इंडियाच्या दृष्टीने ही राजकीय घडामोड अधिक महत्त्वाची असेल. भाजपच्या उत्तरेकडील राज्यांतील प्रबल्याला पूर्व व दक्षिणेकडील राज्यांतून उत्तर दिले जाऊ शकेल. मणिपूरमधील जनतेला केंद्र न्याय देत नसेल तर काँग्रेस देईल, असाही संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

हेही वाचा : पुणे आठवले गटाच्या आरपीआयचा नक्की अध्यक्ष कोण ?

ही यात्रा मणिपूरमधून सुरू होणार असली ती उत्तर प्रदेश मधून मार्गक्रमण करेल, हेही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडून काढून घेऊन अविनाश पांडे यांना प्रभारी केले आहे. इंडियाच्या जागावाटपामध्ये उत्तर प्रदेश कळीचे राज्य असून काँग्रेसने या यात्रेद्वारे उत्तर प्रदेश मध्ये हक्क सांगितला आहे. त्यामुळे इथे समाजवादी पक्ष व काँग्रेस यांच्यातील जागावाटपाच्या संभाव्य वाटाघाटी अधिक गुंतागुंतीच्या होण्याची शक्यता असू शकते.

हेही वाचा : कर्नाटक : गोहत्या, धर्मांतरविरोधी कायदे रद्द करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? लोकसभा निवडणुकीमुळे टाळाटाळ?

या यात्रेची अखेर मुंबईत होणार असल्याने महाविकास आघाडीच्या एकजुटीने शिक्कामोर्तब होईल. शिवाय २८ डिसेंबरला नागपूरमधील जाहीरसभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. मार्चमध्ये ही यात्रा मुंबईत पोहोचणार आहे. मार्चमध्येच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकेल. त्यामुळे काँग्रेससाठीच नव्हे तर भाजपतर्फे इंडिया महाआघाडीला वातावरण निर्मिती करता येईल. हे पाहता भारत न्याय यात्रेची वेळही विचारपूर्वक साधण्यात आली असल्याचे दिसते.

हेही वाचा : “अमित शाह आणि नड्डांचा संदेश फार स्पष्ट”; पश्चिम बंगाल लोकसभेसाठी नेमकी रणनीती काय?

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्याचा राजकीय फायदा कर्नाटक व तेलंगणा या दोन राज्यांमध्ये झाला होता. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यामध्ये यश आले होते. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत मात्र भारत जोडो यात्रेचा प्रभाव फारसा दिसला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नवी यात्रा काढून कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्याचाही प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे दिसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rahul gandhi to undertake manipur to mumbai bharat nyay yatra from january 14 print politics news css