छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कॉग्रेसला तीन खासदारांचे बळ असल्याने जातनिहाय जनगणनेच्या कॉग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मे अखेर पर्यंत हा मेळावा घेण्याविषयी कॉग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर झाली आहे.
काही दिवसापूर्वी ‘ ओबीसी’ चा मेळावा घेतला जावा आणि त्याला कॉग्रेसच्या वरिष्ठांनी यावे अशी चर्चा सुरू होती. मात्र, हा कार्यक्रम सर्वसमावेशक असावा, अशी तयारी आता सुरू करण्यात आली आहे. खासदार कल्याण काळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या कार्यक्रमास राहुल गांधी यांनी यावे, असेही प्रयत्न केले जात आहेत.
जालना लोकसभा निवडणुकीमध्ये ‘ मराठा’ विरुद्ध ‘ ओबीसी’ असा संघर्ष उभा ठाकलेला होता. या संर्घषातून निर्माण झालेल्या सत्ताधारी विरोधी वातावरणाचा लाभ कॉग्रेसला मराठवाड्यात झाला. खासदार कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, रवींद्र चव्हाण निवडून आले. आठ पैकी महायुतीमध्ये केवळ शिवसेनेचे संदीपान भुमरे निवडून आले. ताकद वाढल्याचे लक्षात आल्यानंतर कॉग्रेस प्रभारी रमेश चन्निथल्ला यांनी संघटनात्मक बाबींवर विविध कार्यक्रम आखणीस सुरुवात केली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भभावना यात्रेतून कॉग्रेसची प्रतिमा अधिक उजळून निघावी असे कार्यक्रम घेतले. आता जातनिहाय जनगणेनेचे श्रेय कॉग्रेसचे आहे, हे रुजविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ ओबीसी’ चा एक स्वतंत्र मेळावा घेण्याच्याही हालचाली सुरू होत्या. या कार्यक्रमास खासदार प्रियंका गांधी यांनी यावे अशी चर्चा झाली हेाती. मात्र, एकाच प्रवर्गासाठी कार्यक्रम न घेतना तो सर्व जात समुहांना सामावून घेणारा असावा, अशी चर्चा कॉग्रेसच्या नेत्यांमध्ये झाली.
परभणी येथील कार्यक्रमात रमेश चेन्नीथल्ला यांनी जात्रनिहाय जनगणनेचे श्रेय कॉग्रेसचे आहे, हे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली जात आहे. या अनुषंगाने कॉग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, जातनिहाय जनगणना ही काही शिरगणती नाही. त्यामुळे या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम व्हायला हवेत. गेल्या काही वर्षात शेती आणि बेरोजगारीच्या प्रश्नातून नोकरी हा प्राधान्यक्रम झाला आहे. त्यातून आरक्षणाची मागणी विविध राज्यातून होत आहेत. त्यामुळे जातनिहाय जनगणनेवर चर्चा सुरू व्हायला हव्यात. त्याचा एखादा कार्यक्रम जालन्यात करत येऊ शकेल का, याची चर्चा सुरू आहे. पण कार्यक्रम नक्की ठरलेला नाही. ’