अलिबाग : शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपने कोकण व विशेषत: रायगडमधील कक्षा रुंदविण्याच्या दृष्टीने भर दिला आहे. त्याचबरोबर आगरी समाजाला प्रतिनिधीत्व देऊन हा समाजही बरोबर राहिल याची पक्षाने खबरदारी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धैर्यशील पाटील यांना राजकारणाचे बाळकडून आपले वडील मोहन पाटील यांच्याकडून मिळाले. मोहन पाटील हे शेकापचे जेष्ठ नेते होते. त्यांनी राज्यमंत्रीपद भूषविले होते. त्यामुळे लहान पणापासून धैर्यशील पाटील यांच्यावर डाव्या विचारांचा प्रचंड पगडा होता. ओघवती वक्तृत्वशैली, खणखणीत आवाज अभ्यासपूर्ण भाषणे यामुळे उत्तम वक्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पक्षसंघटनेत त्यांच्या कामाची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षाने सलग तीन वेळा पेण विधानसभेची उमेदवारी दिली. २००९ आणि २०१४ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. मात्र २०१९ मध्ये त्यांच्या भाजपच्या रविद्र पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवानंतर त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

आणखी वाचा-वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

यानंतर भाजपने त्यांच्यावर दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. यावेळी त्यांना लोकसभा निवडणूकीसाठी तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी पक्षसंघटनावाढीवर भर दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्हा भाजप कार्यकारीणीने पक्षश्रेष्टींकडे केली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचा सूर होता. यावेळी देंवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पेण येथे घेतलेल्या जाहीर सभेत धैर्यशील पाटील यांनी केलेला त्याग पक्ष विसरणार नाही. त्यांना पक्षाकडून योग्य वेळी संधी दिली जातील आणि ते खासदार होतील अशी असा शब्द भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला होता.

या आश्वासनानंतर रायगड जिल्ह्यातील भाजपची यंत्रणा सुनील तटकरे यांच्या प्रचारात जोमाने उतरली होती. सुनील तटकरे यांच्या विजयात पेण आणि अलिबाग विधानसभा मतदार संघांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील पाटील यांना दिलेला शब्द पाळला, आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. बॅरीस्टर ए आर अंतुले यांच्यानंतर रायगडमधून राज्यसभेवर जाणारे धैर्यशील पाटील हे दुसरे खासदार असणार आहेत.

आणखी वाचा-Vishwa Hindu Parishad : दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून धर्म संम्मेलनाचं आयोजन; भाजपाच्या मदतीसाठी संघ परिवार मैदानात?

धैर्यशील पाटील यांच्या खासदारकीमुळे कोकणात भाजपच्या राजकीय कक्षा रुंदावणार आहेत. सिंधूदूर्ग आणि रत्नागिरी नारायण राणे लोकसभेवर खासदार आहेत. आता रायगड मध्येही राज्यसभेवर भाजपचा खासदार जाणार असल्याने पक्षाच्या राजकीय कक्षा रुंदावणार आहेत. ठाणे व रायगडमधील आगरी समाजाला आपलेसे करण्यावर भाजपने भर दिला आहे. कपिल पाटील यांचा भिवंडी मतदारसंघात पराभव झाल्याने या समाजातील धैर्यशील पाटील यांना संधी मिळाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhairyasheel patil has been nominated by bjp for rajya sabha seat in konkan print politics news mrj