JMM Leader Kalpana Soren : झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या नेत्या, गंडेय विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या झारखंड विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्या म्हणून समोर आल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना सोरेन यांनी ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून, तब्बल २७ हजार मताधिक्य घेत, भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता त्या दुसऱ्यांदा विजयासाठी सज्ज झाल्या आहेत. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात कल्पना सोरेन यांचे पती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तेव्हापासून कल्पना सोरेन या पक्षातील महत्त्वाच्या नेत्या म्हणून पुढे आल्या आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाच्या स्टार प्रचारक असून, त्यांची सभा मिळावी किंवा त्या प्रचारासाठी याव्यात अशी राज्यभरातून मागणी होत आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने कल्पना सोरेन यांची नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी झारखंडसारख्या आदिवासीबहुल राज्यातील राजकारण, येथील निवडणुकीचे विषय व त्यांच्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीविषयीची माहिती दिली. कल्पना सोरेन यांची मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्र. १५ नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याची स्थापना होऊन २४ वर्षे पूर्ण होत आहेत. दोन तपांनंतर वेगळे राज्य निर्माण करण्याचा हेतू साध्य झाला, असे वाटते का?

कल्पना सोरेन : हा प्रश्न खरं तर भाजपाला विचारायला हवा. २४ पैकी १८ वर्षे भाजपाचे राज्य होते. भाजपाने आखलेल्या धोरणामुळे हे राज्य बरेच मागे गेले. तरी आम्हाला बरेच काही करायचे आहे.

माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कार्यकाळात झारखंड लोकसेवा आयोगाची एकही परीक्षा झाली नव्हती. हेमंत सोरेन यांच्या सरकारने त्यांच्या काळात दोन वेळा परीक्षा घेतल्या. हेमंत सोरेन सरकार आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास राज्यातील तरुणांना वाटतो. जेव्हा परीक्षा रद्द झाल्या, तेव्हा आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबला. परीक्षा सुरू असताना फसवणुकीची कोणत्याही अफवेला थारा मिळू नये, यासाठी आम्ही परीक्षा काळात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल केली. पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाही देत आहोत. अर्थात, ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. स्पर्धात्मक परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय निघून जात आहे याचीही आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी इतर स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्यावर आम्ही भर देणार आहोत.

हे वाचा >> १० लाख नोकऱ्या, १५ लाखांचा आरोग्य विमा; इंडिया आघाडीचा झारखंडसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

गरिबांना घरे देणे, पेन्शनमध्ये वाढ व महिलांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात वळती करणे यासारख्या इतरही योजना आम्ही हाती घेतल्या आहेत.

प्र. पहिल्या टप्प्यात पुरुष मतदारांपेक्षाही महिला मतदारांनी अधिक प्रमाणात मतदान केले. पुरुषांचे स्थलांतर हे एक कारण असले तरी महिलांसाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांचा हा परिणाम आहे, असे वाटते का?

कल्पना सोरेन : झारखंडची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी भक्कम योजना आखलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मदत दिली जाते. फुलो झानो या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. फुलो आणि झानो या झारखंडमधील दोन क्रांतिकारी महिला होत्या. त्यांच्या नावाने फुलो झानो ही योजना चालते. तसेच, आता मय्या सन्मान या योजनेच्या माध्यमातून २१ ते ५० या वयोगटातील महिलांना प्रतिमहिना एक हजार रुपयांची मदत दिली जाते. झारखंडमधील महिलांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजना हव्या होत्या आणि हेमंत सोरेन सरकारने महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत दिली. माझ्या भाषणातूनही मी महिलांसाठी आखलेल्या योजनांची माहिती देत असते. हेमंत सोरेन सरकारच्या योजना क्रांतिकारी असून, त्याचा राजकीयदृष्ट्या आम्हाला नक्कीच लाभ मिळेल.

प्र. निवडणुकीच्या राजकारणात आता तुम्ही सक्रिय झाला आहात. आतापर्यंतचा प्रवास कसा होता?

कल्पना सोरेन : सप्टेंबर महिन्यात ‘मय्या सन्मान यात्रा’ सुरू करीत मी राज्य पिंजून काढले होते. आता निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यात फिरणे होत आहे. महिलांना अनेक दिव्यांतून जावे लागते. शारीरिकदृष्ट्या खूप काही सहन करावे लागते; पण मी तरीही उभी आहे. मला ताप आहे, घसा खवखवतोय; पण जेव्हा मी लोकांमध्ये जाते, भेटायला आलेल्या महिलांना पाहते, तेव्हा मला पुन्हा नवी ऊर्जा प्राप्त होते. माझ्या सभेला राज्यभरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने महिला सभेसाठी येत आहेत आणि या गोष्टीचा मला अभिमान वाटतो.

प्र. ज्यांनी तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केले, त्यांना तुम्ही कसे उत्तर देता?

कल्पना सोरेन : अडचण ही आहे की, झारखंडमध्ये मुद्द्यांवर कुणी चर्चा करीत नाही. झारखंडमधील अधिवास धोरण, मागासवर्गीयांचे आरक्षण, सरना धार्मिक संहिता (आदिवासींसाठी) हे कायदे आम्ही विधानसभेत मंजूर केले आहेत; पण विरोधकांना यावर बोलायचे नाही. आम्ही विकासाचे मुद्दे उपस्थित करीत आहोत आणि ते (विरोधक) लोकांना मूळ मुद्द्यापासून दूर नेत आहेत. झारखंडच्या जनतेला माहीत आहे की, ते (विरोधक) खालची पातळी गाठू शकतात. झारखंडमध्ये आम्ही मुद्द्यांवर निवडणूक लढवीत आहोत आणि लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे.

प्र. तुम्ही आमदार झाल्यानंतर हेमंत सोरेन आणि तुमच्यातील संबंधात काही बदल झाला का?

कल्पना सोरेन : आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा आमच्याशी निगडित मोजकेच बोलतो, बाकी वेळ झारखंडमधील लोकांबाबतच अधिक चर्चा होत असते. आता आमच्यात पूर्वीसारखा दाम्पत्याप्रमाणे संवाद होत नाही. झारखंडमधील चार कोटी जनतेने आम्हाला प्रेम दिले आहे आणि आम्ही याला आमची जबाबदारी मानतो. आम्ही एकमेकांशी भाषणातील मुद्द्यांबाबत चर्चा करतो आणि राजकीय घडामोडींची एकमेकांना माहिती देतो.

प्र. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन झाले, तर कोणत्या गोष्टींना प्राधान्य असेल?

कल्पना सोरेन : राज्यातील युवकांना खूप काही सहन करावे लागले आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला आमचे प्राधान्य असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jmm mla and star campaigner kalpana soren talk about women centric welfare schemes in jharkhand assembly elections 2024 kvg