संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप पूर्ण?

नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे . नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप झालेले आहे.

राजदला आणखी ४३ आमदारांची गरज

याआधी नितीश कुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राजदला सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती. बिहारच्या विधानसभेतील एकूण २४३ आमदारांत राजदचे ७९ आमदार आहेत. बहुमताचा १२२ चा आकडा पार करण्यासाठी राजदला आणखी ४३ आमदारांची गरज आहे. बिहारमध्ये भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे. भाजपाचे सध्या ७८ आमदार आहेत.

कोणाचे किती आमदार, संख्याबळ काय?

राजद- ७९ आमदार
भाजपा- ७८ आमदार
जदयू- ४५ आमदार
काँग्रेस- १९ आमदार
सीपीआय (एमएल)- १२ आमदार
हिंदुस्तानी आवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष)- ४ आमदार

सीपीआय- २ आमदार
सीपीआय (एम)- २ आमदार
एआयएमआयएम- १ आमदार

जदयू आणि भाजपा एकत्र

जदयू आणि भाजपा एकत्र आले तर त्यांच्या आमदारांची संख्या १२३ होते. हा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. भाजपाला हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षाचा पाठिंबा आहे. म्हणजेच या पक्षाचे चार आमदार हे नितीश कुमार आणि भाजपाच्या बाजूने असतील. म्हणजेच नितीश कुमार आणि भाजपा यांना एकत्र येऊन सरकार स्थापन करणे फार अडचणीचे ठरणार नाही.

राजदची मंत्रिपदे भाजपाला देण्यात येणार?

एनडीटीव्हीनुसार भाजपाच्या सर्व आमदारांनी नितीश कुमार यांना पाठिंब्याचे पत्र याआधीच दिलेले आहे. नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता आहे, तर अगोदर राजदकडे असलेली मंत्रिपदे भाजपाला देण्यात येण्याची शक्यता आहे.

महाआघाडीचे नेमके काय होणार?

काँग्रेस, डावे पक्ष आणि राजद एकत्र आले तर त्यांच्या आमदारांची संख्या १४४ होते. नितीश कुमार महाआघाडीतून बाहेर पडल्यामुळे आता महाआघाडीला बहुमतासाठी आणखी आठ आमदारांची गरज आहे. त्यामुळे राजद हा पक्षही सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतो. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar resigns as cm of bihar who new government will be form can rjd claim to form the government prd