Shashi Tharoor in Colambia: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताच्या जागतिक स्तरावरील प्रचार उपक्रमाचा एक भाग म्हणून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ २९ मे रोजी कोलंबियामध्ये पोहोचले. शिष्टमंडळाला संबोधित करताना थरूर यांनी कोलंबिया सरकारबद्दल निराशा व्यक्त केली. कोलंबिया सरकारने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल मनापासून शोक व्यक्त केला होता.

कोलंबियात बोलताना थरूर म्हणाले, “आम्ही कोलंबियातील आमच्या मित्रांना सांगू की, दहशतवादी पाठवणारे आणि त्यांचा प्रतिकार करणारे यांच्यात कोणतीही समानता असू शकत नाही. हल्ला करणारे आणि बचाव करणारे यांच्यात कोणतीही समानता असू शकत नाही. आम्ही फक्त आमच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत आहोत आणि जर याबाबत काही गैरसमज असतील तर आम्ही असा कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी इथे आहोत. या परिस्थितीबद्दल कोलंबियाशी काही सविस्तर बोलताना आमच्याकडे ठोस पुरावेही आहेत. खरं तर जेव्हा हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा ताबडतोब दावा केला होता की द रेझिस्टन्स फ्रंट नावाची संघटना पाकिस्तानातील मुरीदके इथल्या लष्कर-ए-तैयबा तळाचा एक भाग आहे. ज्याप्रमाणे कोलंबियाने अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, तसेच चार दशकांपासून भारतानेही खूप मोठ्या संख्येने हल्ले सहन केले आहेत.”

कोलंबियामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर काय म्हणाले?

“पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण सुरू ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाणं पुरवतो”
शशी थरूर म्हणाले की, “पाकिस्तानात दहशतवाद्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील गणवेशधारी वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये आणि त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या, प्रशिक्षण देणाऱ्या, शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या आणि त्यांचे प्रशिक्षण आणि त्यांच्या इतर कृत्यांसाठी सुरक्षित ठिकाणं पुरवणाऱ्यांमध्ये आणि भारतात फरक आहे.”

शशी थरूर यांनी पुढे म्हटले की, “२२ एप्रिल रोजी भारतावर एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. जेव्हा हे घडले तेव्हा अर्थातच जगाने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, पण हे तेवढेच होते. इतर देशांकडून कोणतीही कठोर पावलं उचलली गेली नाहीत. कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, भारताने असा निर्णय घेतला की अशा प्रकारच्या कृत्यांना शिक्षा दिल्याशिवाय सोडता येणार नाही.”

चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा

याविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की, “आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की चीन पाकिस्तानला त्यांच्या सर्व संरक्षण शस्त्रांपैकी ८१ टक्के शस्त्रांचा पुरवठा करतो. संरक्षण हा एक सभ्य शब्द आहे. पाकिस्तानी लष्कराने ही शस्त्रे संरक्षणासाठी नाही तर हल्ल्यासाठी वापरली. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधील सर्वात मोठा प्रकल्प पाकिस्तानमध्ये आहे. तथाकथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर, जो चीनला नैऋत्य पाकिस्तानमधील एका बंदराशी जोडणारा एक महामार्ग कॉरिडॉर आहे. तसंच या महामार्गाद्वारे पश्चिम चीनमध्ये तुलनेने जलद आणि आर्थिकदृष्ट्या माल वाहून नेण्याची क्षमता आहे. चीनसोबत भागीदारी करण्याला आमचा विरोध नाही. आमचा वाद फक्त आपल्याविरुद्ध दहशतवाद घडवून आणण्याशी आहे.”

भारताला युद्धात रस नाही

कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीच्या प्रश्नावर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, “आम्हाला अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि फ्रान्स, युएई, सौदी अरेबिया तसंच इतर देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक फोन आले. आम्ही या सर्व देशांना दिलेला संदेश अगदी सारखाच होता. आम्हाला युद्धात रस नाही, आम्ही फक्त दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत होतो; जर ते थांबले तर आम्ही थांबतो. जर अशा देशांनी तो संदेश पाकिस्तानला दिला असता, तर कदाचित पाकिस्तानला थांबवण्यात त्याचा परिणाम झाला असता.”

७ मे रोजी भारताने केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यानंतर कोलंबिया सरकारने पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला होता. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रयत्नांचा भाग म्हणून पनामा आणि गयाना दौरा संपवून थरूर यांच्या नेतृत्वाखालील हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरुवारी कोलंबियाला पोहोचले.