बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री पुन्हा एकदा एनडीए आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकीकडे भाजपाचा सामना करण्यासाठी नितीश कुमार यांनीच विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केलेले असताना दुसरीकडे आता तेच भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याची शक्यता असल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, नितीश कुमार यांचा संभाव्य निर्णय, तसेच पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांत इंडिया आघाडीतील वाद यांवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसवर आहे, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहार, पश्चिम बंगालमध्ये धुसफूस

सध्या पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (आप) नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी, “पंजाबमधील सर्व १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘आप’ आपले उमेदवार उभे करणार आहे”, अशी घोषणा केली आहे. तर, आमची इंडिया आघाडीशी जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसून, आगामी लोकसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढू, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. बिहारमध्येही आता नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशमध्येही समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर ठोस तोडगा निघालेला नाही. सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल नाही. एकंदरीत या सर्व परिस्थितीवर अखिलेश यादव यांनी शुक्रवारी (२६ जानेवारी) भाष्य केले. माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या इतर प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली.

काँग्रेसने सर्व पक्षांना एकत्र केले पाहिजे : अखिलेश यादव

“आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असे ममता बॅनर्जी म्हणत आहेत. काँग्रेसने त्यांचे मन वळवायला हवे. अन्य लहान पक्षांना एकत्र आणण्याचे काम काँग्रेसने केले पाहिजे,” असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच नितीश कुमार यांच्याबाबत होत असलेल्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “नितीश कुमार हे पुन्हा एकदा एनडीएत जाणार नाहीत. त्याऐवजी ते इंडिया आघाडीलाच आणखी बळकट करतील,” अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.

“विजयाची शक्यता लक्षात घेऊनच जागावाटप”

उत्तर प्रदेशमध्ये सध्या जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. त्यावरही अखिलेश यादव म्हणाले की, चांगल्या पद्धतीने युती आकाराला येत आहे. ही युती जागांसाठी नव्हे, तर विजयाचे गणित लक्षात घेऊनच करण्यात आली आहे. एखाद्या पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या काहीही असू शकते. मात्र, जिंकण्याची शक्यता ही एकच बाब समोर ठेवून ही युती झालेली आहे. विजयाची शक्यता ही एकमेव बाब लक्षात घेऊन जागावाटप केले जात आहे.

समाजवादी पार्टी – आरएलडी यांच्यात युती

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी हा इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. या राज्यात समाजवादी पार्टीची राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) आणि काँग्रेस या दोन पक्षांशी युती आहे. काही दिवसांपूर्वीच आरएलडी आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांतील युतीला मूर्त रूप आलेले आहे. समाजवादी पार्टीने आरएलडीला एकूण सात जागा दिल्या आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून बोलणी सुरू आहेत.

राजीव राय यांची काँग्रेसवर टीका

भारतीय पुरातत्त्व खात्याने नुकतेच ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणाचा अहवाल दिला आहे. या अहवालावरही अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत आलेले अपयश झाकण्यासाठी सरकार या गोष्टी बाहेर काढत आहे. बंधुत्वाची भावना नष्ट करण्यासाठी अशा प्रकारचा कट रचला जात आहे,” असे अखिलेश यादव म्हणाले.

“आघाडीला कमकुवत करण्यासाठी यात्रा?”

गुरुवारी (२५ जानेवारी) समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजीव राय यांनी काँग्रेसवर टीका केली होती. “बिहारमधून नितीश कुमार यांच्याबाबत काही बातम्या समोर येत आहेत. काँग्रेसने स्वत:ला आपण काय करीत आहेत, हे प्रामाणिकपणे विचारले पाहिजे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बांगलादेश या राज्यांतील तुमचे नेते इतर पक्षांवर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीशिवाय हे सर्व काही घडत असेल का,” असा प्रश्न राजीव राय यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party president akhilesh yadav comment on nitish kumar mamata banerjee stand on india alliance prd