दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : शिवसेनेची साथ सोडण्याची माने घराण्याची ही दुसरी वेळ. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यानंतर निवेदिता माने यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून घड्याळ हाती बांधले आणि खासदारकी मिळवली. आता त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी खासदारकीची संधी देणाऱ्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय व भाजपची वाढती ताकद यामुळे धैर्यशील माने यांनी २०२४ मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी राजकीय सोय म्हणून शिंदे गटात सामील होण्याच निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

तसे पाहिले तर माने कुटुंब आणि खासदारकी यांचे जुने नाते आहे. एक दोन नव्हे तर तब्बल आठ वेळा माने घराण्यातील तीन पिढ्यांनी संसदेत पाऊल टाकले आहे. धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने यांनी या मतदारसंघात सलग पाच वेळा काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर निवेदिता माने यांनी प्रथम अपक्ष म्हणून तर दुसऱ्यांदा शिवसेनेकडून निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पराभूत केले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यावर निवेदिता माने यांनी हाती घड्याळ बांधून आवाडे यांचा पराभव केला. निवेदिता माने या दोन वेळा खासदार झाल्या. तिसऱ्या वेळी २००९ मध्ये त्या राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या.

हेही वाचा… श्रीरंग बारणे – आधी पक्षनिष्ठेचे दर्शन, नंतर बंडखोरांचे समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होत आहे व संधी दिली जात नाही, असा आरोप करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील माने यांचे युवा नेतृत्व हेरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी, मोदी लाट, भाजपने केलेले प्रयत्न त्यामुळे ते शेट्टी यांचा लाखभर मतांनी पराभव करून विजयी झाले.

तरुण नेतृत्व आणि वक्तृत्व याचा मिलाप असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना जवळ केले. शिवसेनेचे प्रवक्तेपद दिले.

हेही वाचा… राहुल शेवाळे: सत्तेसाठी सोयीची जुळवाजुळव हेच कायमचे तंत्र

गेली अडीच वर्षे धैर्यशील माने मातोश्रीच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. पण नंतर त्यांचा कल एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिला. शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी इचलकरंजी महापालिका दर्जा मिळवण्याचे उल्लेखनीय काम केले. परिणामी शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यावर धैर्यशील माने यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गट आणि भाजपचे बळ वाढत आहे. जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर या प्रमुख नेत्यांचे पाठबळ मिळून लोकसभेत दुसऱ्यांदा पोहोचणे शक्य होईल, असा त्यांचा कयास आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second time mane family from kolhapur left shiv sena pint politics news asj