पिंपरी : वर्तुळाकार (रिंग रोड) रस्ता केल्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटू शकत नाही. रिंग रोडची निविदा काढली आहे. रिंग रोडला समांतर लोहमार्ग करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या तसे विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले. हा मार्ग झाल्यास पुणे स्थानकावरील ताण काम होईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मंगळवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या वेळी माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शाम लांडे यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘पुढील ५० वर्षांचे नियोजन करून शहराचा विकास केला. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामात काहींनी स्वत:ची पोळी भाजून घेतली. शहरातील वाढत्या लोकसंख्येला वाढीव पाण्याची आवश्यकता आहे. गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. झोपड्या नसताना झोपड्या दाखवून ‘टीडीआर’ काढला जातो. अशा तक्रारी आल्या आहेत. त्यात तथ्य किती हे शोधले पाहिजे. दूषित पाणीपुरवठा, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था यावर काम केले जाईल. शहराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास केला जाईल. भोसरी विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी भागाला अतिक्रमणाचा विळखा असल्याच्या तक्रारी येत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते अतिक्रमण काढले जाईल.’

‘यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने पुढे चाललो आहोत. महाराष्ट्रात शिव-शाहू-फुले आंबेडकरांची विचारधारा रुजली आहे. काही पक्ष शहरात काम करू शकत नव्हते. त्यांच्याकडे कार्यकर्तेही नव्हते. राष्ट्रवादीतील लोकांनाच पक्षात घेऊन त्यांना ताकद दिली. अजित गव्हाणे हे शरीराने तिकडे असले, तरी मनाने इकडे होते. ते दुसरीकडे आहेत, असे वाटत नव्हते. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. नव्या जुन्यांचा वाद होणार नाही. चारचा प्रभाग होण्याची दाट शक्यता आहे. प्रभागात संपर्क वाढवावा,’ अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

पालिका आयुक्तांची लवकरच बदली

‘रेड झोनच्या मोजणीचा नकाशा प्रसिद्ध करण्यासह शहरातील विविध प्रश्न सोडविले जातील. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली होऊन नवीन आयुक्त येण्याची दाट शक्यता आहे. नवीन आयुक्तांसोबत चर्चा करून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील,’ असेही पवार म्हणाले.