पुणे : पालखी सोहळ्यात गर्दीचे नियंत्रण, तसेच व्यवस्थापन करण्यासाठी यंदा प्रथमच पुणे पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला. एआय तंत्रज्ञानाद्वारे पोलिसांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या मोजली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात चार लाख ९० हजार वारकरी सहभागी झाल्याची माहिती एआय तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलेल्या मोजणीतून मिळाली आहे.
पालखी सोहळ्यात यंदा सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची नोंद करण्यासाठी पुणे पोलिसांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांची मदत घेतली. पोलिसांनी पालखी मार्गावर वेगवेगळ्या भागांत हे कॅमेरे बसविले होते. पुणे-मुंबई रस्त्यावरील नरवीर तानाजीवाडी, संचेती रुग्णालय, वेधशाळा चौक, खंडुजीबाबा चौक, लक्ष्मी रस्ता भागात हे कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यांनी केलेली नोंद आणि माहितीचे विश्लेषण करण्यात आले. पालखी प्रस्थान सोहळ्यात हे कॅमेरे प्रस्थान मार्गावर बसविण्यात आले होते.
पालखी सोहळा शुक्रवारी (२० जून) शहरात दाखल झाला. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर वारकरी आणि दिंडीतील ६०० वाहने शहरात दाखल झाली होती. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर वारकरी बांधव आणि दोन हजार वाहने शहरात दाखल झाली, अशी माहिती एआय तंत्रज्ञानावर आधारित विश्लेषणातून करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे गर्दीचे व्यवस्थापन, नियोजन आणि वाहतूक नियोजनात मदत झाली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पालखी सोहळ्यावेळी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा यंदा वापर करण्यात आला. त्याद्वारे नियोजन, अंमलबजावणी, तसेच विश्लेषण करण्यात आले. कडक बंदोबस्तासह आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे