पुणे : आयुष्यात असलेल्या आव्हानांना जिद्दीने सामाेरे जाऊन अनेक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा अवघड टप्पा यशस्वीरित्या गाठला आहे. कष्टांना संयम आणि अभ्यासाची जोड देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. शिक्षणच आयुष्याचा मार्ग प्रशस्त करू शकते, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या पालकांच्या मुलांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. श्रुती जाधवचे वडील कचरावेचक म्हणून काम करतात. मॉडर्न महाविद्यालयात शिकणाऱ्या श्रुतीने बारावीला ८२.७ टक्के गुण मिळवले. घरातील कामे करतानाच कोणतीही शिकवणी न लावता श्रुतीने यश संपादन केले. श्रुतीला अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेऊन अर्थशास्त्राचे अध्यापन करण्याची इच्छा आहे. मीनाक्षी इंगळेने वाणिज्य शाखेत ८१ टक्के गुण मिळवले. साक्षी फडकेने स. प. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत ७७.८३ टक्के गुण मिळवले. तिचे आई-वडील घर चालवण्यासाठी कष्ट करतात. तर, वाडिया महाविद्यालयातील सायराज सोनवणे याने वाणिज्य शाखेतून ७३ टक्के गुण मिळवले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्दीने अभ्यास करत तो बारावी उत्तीर्ण झाला. साक्षी कांबळेच्या वडिलांचे चौदा वर्षांपूर्वी निधन झाले. आई कचरावेचक म्हणून काम करते. साक्षीने विज्ञान शाखेत ६४ टक्के गुण मिळवले.
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनीही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. सरस्वती संस्थेच्या पूना नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैथिली धाडवे हिने ७३.१७ टक्के, रोशन डिके याने ७२.८३ टक्के, तर देवकन्या घरबुडवे हिने ६८ टक्के गुण मिळवले. महाविद्यालयाचा निकाल ७१.२३ टक्के लागला. कॉल सेंटरमध्ये काम करणारी मैथिली म्हणाली, ‘दिवसा काम करून रात्री अभ्यासासाठी वेळ काढायचे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वडील कपड्यांच्या दुकानात, तर आई कंपनीत काम करते. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नव्हते. शिक्षणाबरोबरच कुटुंबालादेखील आर्थिक हातभार लावायचा होता. त्यामुळे मी रात्रशाळेत शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.’
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवडे येथील रोशनने शिक्षणाचा खर्च स्वतःच करण्याचे ठरवून काम करण्यास सुरुवात केली. काम करत अभ्यासही केला. तर, आयटी कंपनीत काम करणाऱ्या देवकन्या यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली. हिना शेख यांनी बारा वर्षांच्या खंडानंतर पुन्हा शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या २८व्या वर्षी त्या ६३ टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
दहावीची परीक्षा सलग पाच वर्षे…
रोहित मोहिते हा विद्यार्थी पाचवीत असताना त्याची आजी आजारी पडल्याने रुग्णालयाच्या चकरा, कामाची ओढाताण, आर्थिक अडचणींमुळे त्याच्या शिक्षणात खंड पडला. दहावीत असताना त्याला अपस्माराचा त्रास होऊ लागला. दहावीत त्याचे तीन विषय राहिले. त्यामुळे २०१७ ते २०२३ दरम्यान त्याने पाच वेळा दहावीची परीक्षा दिली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन बारावीत ६६.१७ टक्के गुणांसह यश मिळवले.
अंध विद्यार्थ्यांचेही यश
निवांत अंध मुक्त विकासालयातील विद्यार्थ्यांनीही बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. कला शाखेत अंबिका गवते हिने ८९.५० टक्के, प्रांजली मुळे हिने ८७.१७ टक्के, ज्योत्स्ना डोंगरे हिने ८५.६७ टक्के, तर वाणिज्य शाखेत निधीश माने याने ८५.८३ टक्के, अमृत पवारने ७९.५० टक्के, आशिष भंडारे याने ६८.१७ टक्के गुण मिळवले. त्याशिवाय बीएमसीसीचा विद्यार्थी असलेल्या अक्षय दंडवते या विद्यार्थ्याने संगणकावर स्वत: टंकलेखन करून परीक्षा दिली होती. त्यासाठी राज्य मंडळाने परवानगी दिली होती. अक्षयने बारावीत ८०.५० टक्के गुण मिळवले. अक्षयने संगणक टंकलेखनाचे प्रशिक्षण निवांत अंध मुक्त विकासालयातील ‘स्वलेखन’ प्रणालीद्वारे घेतले होते, अशी माहिती संस्थेच्या उमा बडवे यांनी दिली.