पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने (पीएमपीएमएल) आळंदी आणि देहू या मार्गांवर जादा विशेष ‘पीएमपी’ सोडण्यात येणार आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाने याबाबत नियोजन केले असून, वेगवेगळ्या आगारांतून या मार्गांवर बस सोडण्याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून बुधवारी (१८ जून), तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीतून गुरुवारी (१९ जून) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी दाखल होत असतात. वारकऱ्यांना देहू आणि आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, म्हणून सोमवारपासून (१६ जून) शुक्रवारपर्यंत (२० जून) जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
श्री क्षेत्र आळंदीसाठी बसचे नियोजन
- स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड आणि पिंपरी आगारातून जादा बस सोडण्यात येईल.
- नियमित संचलनातील आणि जादा अशा एकूण १४६ बस दररोज या मार्गांवर धावणार.
- १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पीएमपीची सेवा सुरू असणार.
- २० जून रोजी पहाटे तीन वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा, हडपसर येथून १६ जादा बस असतील.
श्री क्षेत्र देहूसाठी बसचे नियोजन
- पुणे स्टेशन, मनपा, निगडी या आगारांमधून बस सोडण्यात येणार.
- नियमित संचलनातील आणि जादा बस अशा एकूण ३७ बस दररोज या मार्गांवर धावणार.
- देहू ते आळंदी मार्गावर एकूण २३ बस सोडण्यात येणार.
- पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील जवळच्या आगारांमधून नियमित ११३ बस व्यतिरिक्त आळंदीसाठी भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत बस धावणार.
- प्रवाशांनी मागणी केल्यास आणखी बस सोडण्याबाबत व्यवस्था. (किमान ४० प्रवाशांची संख्या आवश्यक)