पुणे : ‘पुण्यात जानेवारी महिन्यात झालेला गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक कोंबड्यांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याबाबत संशोधन सुरू असून, लवकरच अंतिम निष्कर्ष हाती येईल,’ अशी माहिती राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. नवीन कुमार यांनी रविवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात ९ जानेवारीपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. त्यानंतर जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात हा उद्रेक झाला होता. पुण्यात जीबीएसचे २०२ रुग्ण आढळले होते. त्यात पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३४, पुणे ग्रामीण ४० अशी रुग्णसंख्या होती. याचबरोबर जीबीएसमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएस उद्रेकग्रस्त भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण न आढळल्याने पुण्यातील जीबीएसचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. मात्र, या उद्रेकाचे नेमके कारण आरोग्य विभागाने अद्याप जाहीर केलेले नाही.

या पार्श्वभूमीवर डॉ. नवीन कुमार म्हणाले की, जीबीएस हा ८ ते ९ प्रकारच्या संसर्गांमुळे होतो. त्यातही ५० टक्के प्रकरणांमध्ये तो नेमका कशामुळे उद्भवला हे सापडत नाही. त्यामुळे आम्ही जीबीएस उद्रेकावेळी त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सर्व जीवाणू आणि विषाणूंची तपासणी सुरू केली. आम्ही सुमारे २६ प्रकारच्या रोगकारक घटकांची तपासणी केली. आमच्याकडे तीनशेहून अधिक नमुने तपासणीसाठी आले. या तपासणीत प्रामुख्याने नोरोव्हायरस आणि कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आढळून आले. नोरोव्हायरसमुळे जीबीएसचा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळे कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी संसर्गावर लक्ष केंद्रित केले.

कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग नेमका कोठून झाला, यासाठी पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी काही रुग्णांच्या घरातील नळाच्या पाण्यामध्ये तो आढळून आला. हा पाणीपुरवठा खडकवासला धरणातून होत होता. धरणाच्या परिसरात कुक्कुटपालन केंद्रे असल्याने तेथील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने आम्ही तपासले. त्या केंद्रातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा जीवाणू आढळून आला. त्यामुळे जीबीएसचा उद्रेक कोंबड्यांमुळे झाल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. याबाबत संशोधन सुरू असून, लवकरच अंतिम निष्कर्ष येईल, असेही डॉ. कुमार यांनी सांगितले.

महापालिकेच्या क्लोरिनेशनवर प्रश्नचिन्ह

खडकवासला धरणातील पाणी नांदेड गावातील विहिरीत सोडले जात होते. तिथे पाणी निर्जुंतिकीकरणासाठी क्लोरिनेशनची प्रक्रिया पुणे महापालिकेकडून केली जात होती. या प्रक्रियेवर डॉ. कुमार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, क्लोरिनेशनची प्रक्रिया एक तर योग्य पद्धतीने सुरू नव्हती अथवा महापालिकेकडून प्रक्रिया सुरू होती. परंतु, त्यात काही दोष होते. त्यामुळेच पाण्याचे निर्जुंतिकीकरण होऊ शकले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gbs outbreak in pune due to chickens information from niv director dr naveen kumar pune print news ssb