पुणे : वीज यंत्रणेत बिघाड झाल्याने हिंजवडी परिसरातील ‘आयटी’ कंपन्यांसह ५२ हजार घरगुती ग्राहकांचा रविवारपासून (६ जुलै) विस्कळीत झालेला वीजपुरवठा ‘महापारेषण’ला बुधवारी (९ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरळीत करण्यात यश आले. सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.
हिंजवडी आणि पेगासस उपकेंद्रातील वीजपुरवठा देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ‘महापारेषण’कडून रविवारी सकाळी ११ वाजता बंद करण्यात आला होता. मात्र, देखभाल-दुरुस्तीनंतर दुपारी सव्वादोन वाजता ‘इन्फोसिस ते पेगासस’ अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाल्याने उपकेंद्रातील वीजपुरवठा सुरू झाला नाही.
उपकेंद्रातील २५ उच्चदाब वाहिन्यांतील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे सुमारे ५२ हजार घरगुती ग्राहक, ‘इन्फोसिस’, ‘नेक्स्ट्रा’ या मोठ्या आयटी कंपन्यांसह ९१ उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
‘‘महापारेषण’च्या वीज वाहिनीतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने ‘महावितरण’कडून पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. सोमवारी सायंकाळी चारपर्यंत ३५ उच्चदाब ग्राहक आणि अतिउच्चदाब ग्राहक वगळता सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला.
मंगळवारी उर्वरित २६ उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला, तर दहा मोठ्या आयटी उद्योगांना चक्राकार पद्धतीने दिवसातून प्रत्येकी पाच तास वीजपुरवठा करण्यात आला. बिघाड दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (९ जुलै) दुपारी साडेबारा वाजता सर्वच वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला,’ अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
‘महापारेषण’चे संचालन विभागाचे संचालक सतीश चव्हाण, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, अधीक्षक अभियंता विठ्ठल भुजबळ, ‘महावितरण’च्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड आणि युवराज जरग यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
‘महापारेषण’चा बिघाड मोठ्या स्वरूपाचा होता. बाधित उपकेंद्रातील विजेची मागणी पाहता इतर उपकेंद्रांतून पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्याचे आव्हान होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. – सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण
दुरस्ती पूर्ण करून ‘हिंजवडी ते पेगासस’ वीजवाहिनी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू करण्यात आली. आता ‘आयटी’ उद्योगांसह घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. बिघाडाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, वीजवाहिनीतील केबलचा जोड तुटल्याचे निदर्शनास आले – विठ्ठल भुजबळ, अधिक्षक अभियंता, महापारेषण