पुणे : राज्यातील सहा जिल्ह्यांत सोमवारी (२७ मे) उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता जास्त राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर गुजरात आणि मध्य प्रदेशात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भात तापमान वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. सोमवारी प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, धुळे, जळगावात आणि चंद्रपूर येथे पुढील तीन दिवस तर, अकोल्यात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या किनारपट्टीवर पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तुमची मुले नीट वागतात का?”, अजित पवार यांचा बांधकाम व्यावसायिकांना सवाल

दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, रविवारी नैऋत्य मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरात आगेकूच करून मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मजल मारली.

यवतमाळ ४६ अंशांवर

विदर्भात कमाल तापमान सरासरी ४३ अंशांवर आहे. रविवारी राज्यात सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यवतमाळमध्ये झाली. त्या खालोखाल अकोल्यात ४५.२, अमरावतीत ४४.२, भंडाऱ्यात ४३.३, चंद्रपुरात ४३.२, गडचिरोलीत ४३.३, गोंदियात ४४.४, वर्ध्यात ४४.१ आणि वाशिमध्ये ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील पारा चढाच राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात नांदेडमध्ये ४३.६ आणि औरंगाबादमध्ये ४१.८ अंश तापमान होते. मध्य महाराष्ट्रात जळगावात ४०.७ आणि सोलापूर येथे ४०.४ अंश तापमान होते. किनारपट्टीवर डहाणूत ३५.९ कुलाब्यात ३४.३ आणि सांताक्रुजमध्ये ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.

हेही वाचा : पुणे-दौंड मार्गावर ‘मेमू’ची तात्पुरती मलमपट्टी, डेमू दुरुस्तीसाठी मुंबईला; भुसावळ विभागाची गाडी केवळ एक महिन्यासाठी

रेमल चक्रीवादळाची धडक

बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल महाचक्रीवादळ रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बांगलादेशातील खेपुपारा आणि भारताच्या सागर द्वीप समूहाच्या मध्यभागी बांगलादेशातील मोंगला नजीक धडकण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता रेमल महाचक्रीवादळ ताशी १३ किलोमीटर वेगाने उत्तरेच्या दिशेने वाटचाल करीत होते. सध्या महाचक्रीवादळाच्या केंद्रस्थानी वाऱ्याचा वेग १०० ते १२० किमी प्रति तास इतका आहे. रेमल किनाऱ्यावर धडकण्याच्या वेळी वाऱ्याचा वेग ११० ते १२० वरून वाढून १३५ किमीवर जाण्याचा अंदाज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra heatwave alert in 6 districts on 27th may 2024 weather updates pune print news dbj 20 css