पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरासमोरील पुलाखाली मध्यरात्री मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला. या घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. या खेरीज जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा. शासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ट्रक आणि खासगी बसच्या पहाटे झालेल्या अपघातात चारजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन विचारपूसही केली. या भागात सातत्याने होणारे अपघात थांबवण्यासाठी तातडीने उपायोजना करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण लवकरच चर्चा करून आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहोत. संसदेतही हा मुद्दा आपण मांडला असून सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – पिंपरी महापालिकेने नऊ वॉशिंग सेंटरचे बेकायदा नळजोड तोडले

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पूल परिसरात नोव्हेंबरमध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे सुळे यांनी नमूद केले.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची-भाग ७७ : इ. स. पूर्व १२०० व्या शतकातील पांडवकालीन ‘बाणेश्वर लेणी’

घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस पोलीस वेळेत पोहोचले होते, याबद्दल त्यांचे मी आभार मानते. प्रशासनानेदेखील या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची गरज आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.