पिंपरी : स्थानिक नागरिकांचा विरोध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडीनंतर आता चऱ्होलीतील प्रस्तावित नगर रचना योजना (टीपी स्कीम) रद्द केली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चऱ्होलीतील एक हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावरील पाच भूखंडांवर आणि चिखलीतील ३८० हेक्टर क्षेत्रावर नगर रचना योजना प्रस्तावित केली होती. त्याची जाहीर नोटीस २९ एप्रिल रोजी जाहीर करून हरकती व सूचना मागवल्या. मात्र, ही योजना जाहीर होताच दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक, जागा मालकांसह सर्वपक्षीयांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर चिखलीतील नगर रचना योजना रद्द केल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी जाहीर केले.

मात्र, चऱ्होलीतील योजना कायम ठेवली होती. त्याला तीव्र विरोध करत स्थानिक नागरिकांनी आंदोलनेही केली. त्यानंतर चऱ्होलीतील नगर रचना स्थगित करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. मात्र, स्थगिती नको, रद्द करा अशी मागणी स्थानिकांनी केली.

ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी शहर दौऱ्यावर असताना चऱ्होलीतील नगर रचना योजना रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा सुनियोजित विकास करता येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी योजना रद्द करण्यास मान्यता दिली.

नगर रचना योजनेची अंमलबजावणी करण्यास जमीन मालकांचा प्रचंड विरोध आहे. त्यांचा विरोध डावलून योजना राबविणे योग्य वाटत नाही. त्यामुळे चऱ्होलीतील योजना रद्द करणे आवश्यक होते. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

चिखलीतील नगर रचना योजनेवरून राजकीय संधीसाधूंनी भूमिपूत्र, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एक घाव दोन तुकडे’ केल्याची भूमिका घेत चऱ्होली योजना रद्दची घोषणा केली. भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे. – महेश लांडगे, आमदार.