पिंपरी : औद्योगिक परिसरातील विविध कंपन्यांसाठी कच्चा, पक्क्या मालाची आवक-जावक करण्याकरिता जड, अवजड वाहनांचा वापर केला जातो. या अवजड वाहनांवर पाेलिसांनी वाहतूक काेंडीचे कारण देऊन निर्बंध घातले असून, आता तर प्रवेश बंदीत वाढ करून दिवसभरात केवळ चार तासच जड वाहनांना प्रवेश दिला जात आहे. उद्याेजकांना याचा फटका बसला आहे. उद्योगाच्या पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला असून, परिणामी कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरालगत चाकण, भोसरी, म्हाळुंगे, तळेगाव दाभाडे, रांजणगाव अशा प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणच्या हजारो कंपन्यांमध्ये कच्चा माल आणणे आणि तयार झालेला माल नेण्यासाठी रस्त्यामार्गे वाहतूक केली जाते. ‘एमआयडीसी’मधून तळेगाव दाभाडेमार्गे मुंबई बंदरातून उत्पादित माल जगभरात पोहोचविला जातो. ट्रक, कंटेनरद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर ही पुरवठा साखळी अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ‘एमआयडीसी’कडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीच्या वेळेत वाढ केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, सांगवी, वाकड, बावधन, पिंपरी, देहूरोड, म्हाळुंगे, चाकण, दिघी, आळंदी, भोसरी, तळेगाव दाभाडे परिसरात जड, अवजड वाहनांना दिवसभरात केवळ चार तास प्रवेश दिला जात आहे. त्याचा उद्योगांना फटका बसला आहे. कच्चा माल येण्यास विलंब झाल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. कामगार बसून राहतात. उत्पादित मालही बाहेर पाठविण्यात अडथळा येत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असलेल्या शहर परिसरात जड, अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या बाजूला दररोज काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग आणि औद्योगिक वसाहतींमधील प्रमुख मार्गांवर अजवड वाहने थांबविल्याने येथील कोंडीत उलट भर पडत आहे.

तळेगावातील ट्रक टर्मिनलचे काम अपूर्ण

तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात दोन ट्रक टर्मिनल उभारले जात आहेत. एका टर्मिनलची क्षमता २०० ट्रक एवढी आहे, तर दुसऱ्या टर्मिनलची क्षमता ३५० ट्रक उभ्या राहतील एवढी आहे. या दोन्ही टर्मिनलचे काम २०२३ मध्ये सुरू झाले. ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही.

‘एमआयडीसी’त ट्रक टर्मिनलची मागणी

एमआयडीसी परिसरात सुमारे ५०० अवजड वाहने उभी करता येतील, एवढ्या मोठ्या क्षमतेच्या ट्रक टर्मिनलची आवश्यकता आहे. येलवाडी जवळ ५५ एकर जागेत प्रशस्त ट्रक टर्मिनल बनविण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही हालचाल झाली नाही. सध्या भोसरी एमआयडीसी परिसरात एफ टू ब्लॉक, टी ब्लॉक आणि भोसरी येथे, असे तीन ट्रक टर्मिनल विकसित करण्याची उद्योजकांची मागणी आहे.

अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. कच्चा माल येण्यास विलंब झाल्याने कामगार बसून राहतात. हा निर्णय कंपन्यांना त्रासदायक आहे. यामुळे उद्योग करणे अवघड होईल. ५०० वाहन क्षमतेचे ट्रक टर्मिनल विकसित करावे. – दिलीप बटवाल, मुख्याधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

ठरावीक वेळेत मालाची आवक-जावक करणे अशक्य आहे. याचा उत्पादनाला मोठा फटका बसत आहे. अवजड वाहतूक रोखण्याऐवजी वाहनतळांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनल विकसित करावे. प्रवेश बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना