पुणे : ‘पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक यासह इतर राज्यांच्या लोकसंस्कृती, लोककलेला तेथील विविध संस्थांनी बळ दिले. मात्र, महाराष्ट्रात लोकसंस्कृती, लोककलेचा अभ्यास करणारी प्रबळ संस्था नाही,’ अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष, लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी शनिवारी व्यक्त केली.
संवाद पुणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रा. डॉ. प्रकाश खांडगे संपादित ‘शिव शक्ती संप्रदायाची लोक गान परंपरा’ या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, लोकसाहित्याचे अभ्यासक प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे, शैला खांडगे, सुनील महाजन या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘अन्य राज्यांतील संस्थांनी विविध कलाविष्कारांतून आपल्या लोकपरंपरा जिवंत ठेवल्या आहेत. देशभर कीर्ती गाजविणाऱ्या अशा कलावंतांची नावे सगळ्यांना माहिती आहेत. महाराष्ट्रात लोकसंस्कृतीचा संचित खजिना असून, त्यांचे थोर अभ्यासक आहेत. नव्या दृष्टीने या संचिताचा अभ्यास करणारी तरुणांची फळी आहे. मात्र, या अभ्यासकांच्या मागे उभी राहणारी संस्था अद्याप महाराष्ट्रात नाही. या पार्श्वभूमीवर खांडगे यांच्या कामाची दखल घेतली पाहिजे.’
डॉ. मोरे म्हणाले, ‘लोकपरंपरा आणि संशोधक यांच्यामध्ये कोणताही विरोध असता कामा नये. हे दोघे विरोधक नव्हे, तर पूरक आहेत. डॉ. खांडगे यांनी लिहिलेला ‘शिव शक्ती संप्रदायाची लोक गान परंपरा’ हा ग्रंथ महाराष्ट्राशिवाय राजस्थान, कर्नाटक आणि बंगालमधील लोकपरंपरा, संस्कृतीचा अभ्यास आहे. त्याची व्याप्ती देशभर आहे. आपली लोकसंस्कृती सांगणारे लोक पुढे आले पाहिजेत.’कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले. आभार निकिता मोघे यांनी मानले.