पुणे : ‘भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुणेकरांनी मतदान केले. त्याच मतदारांना ठेंगा दाखविण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. महापालिकेला मागणीनुसार पाण्याचा हक्काचा कोटा न देता उलट महापालिकेला दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे, हा प्रकार संतापजनक आहे,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी जलसंपदा विभागाने २१ टीएमसी पाणी महापालिकेला द्यावे, त्याचा करार करावा, अशी मागणी महारपालिकेकडून केली जात आहे. ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी भाजपचे शहरातील नेते काहीही पाठपुरावा करत नाहीत. उलट भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला थकबाकी वसुलीसाठी नोटीस पाठविली आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी केली जाणारी अडवणूक आहे,’ अशी टीका जोशी यांनी केली.

‘जलसंपदा खात्याने नोटीस बजावल्यानंतरही शहराचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे इतर खासदार, आमदार शांत बसतात हे आश्चर्यकारक आहे. निवडणुकीपूर्वी शहराला पुरेसे पाणी देऊ अशी आश्वासने द्यायची आणि नंतर या आश्वासनांना हरताळ फासायचा, हा प्रकार सुरू असल्याची टीका जोशी यांनी केली. शहरासाठी जलसंपदा विभागाने पाण्याची वाढीव मागणी तातडीने मंजूर करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन करेल,’ असा इशारा जोशी यांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune voters supported bjp in elections but bjp ignored and cheated punekars former congress mla mohan joshis allegation pune print news ccm 82 sud 02