पुणे : ‘स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या पिढीचा प्रतिनिधी या नात्याने देशाच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा मी साक्षीदार आहे. ही सुधारणा करणारे राजकीय नेते एका अर्थाने उद्योजकच असतात. देशाची प्रगती राजकारण्यांच्या दूरदृष्टीतूनच होत असते. प्रशासनामध्ये राहून त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करणारे आम्ही केवळ निमित्तमात्र असतो,’ अशी भावना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डाॅ. विजय केळकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
‘पुण्यभूषण फाउंडेशन’च्या वतीने केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा यांच्या हस्ते डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी केळकर बोलत होते. पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई आणि उद्योजक गजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या शिपाई अनिल कुमार कच्छी, एक्स पॅराट्रूपर के. व्ही. आप्पा राव, शिपाई प्रशांत वसंत कांबळे, शिपाई दीपक बर्मन या जवानांसह वीरमाता सुवर्णा गोडबोले यांचा सन्मान करण्यात आला.
‘वडिलांची बदली झाल्यामुळे १९४६ साली मी पुणेकर झालो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील माॅडर्न शाळेचा माझ्यावर प्रभाव आहे. गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आई-वडिलांनी दिलेली सत्याची मूल्ये जीवनात ध्रुवताऱ्यासारखी पुरली. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्र उभारणीसाठी आमच्यामध्ये स्फुल्लिंग चेतवले. या प्रक्रियेचा पाइक झालो याचा मला सार्थ अभिमान आहे. हा सन्मान आई-वडील, शाळेतील गुरुजन आणि सहचारिणी लता यांना अर्पण करतो,’ असे केळकर यांनी सांगितले.
‘दिल्लीतील वास्तव्य तुमच्या हातून घडलेल्या ‘पापां’वर अवलंबून असते. ‘पापक्षालन’ झाल्याशिवाय दिल्ली सोडता येत नाही,’ असे ते म्हणाले. ‘वित्त आयोगाचे अध्यक्षपद पुन्हा एकदा स्वीकारावे, अशी सूचना तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनी केली, तेव्हा मी ती स्वीकारली. त्यावेळी ‘जनतेची सेवा हाच तुमचा धर्म आहे,’ असे मुलीने मला सांगितले होते,’ अशी आठवण केळकर यांनी सांगितली.
‘समाजवादी, साम्यवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेविषयी वैचारिक संघर्षाच्या काळात डॉ. विजय केळकर यांनी दूरदृष्टी ठेवून वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) पुनर्रचनेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला एक दिशा दिली. भारतीय अर्थव्यवस्थेत उदारमतवाद रुजवण्यात केळकर यांचे योगदान मोठे आहे,’ असे गडकरी म्हणाले.
‘आता निधीची अडचण नसून, कामे गतीने होत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. अर्थ खात्याचे सचिव असताना केळकरांनी आखलेल्या धोरणांमुळे भारताच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना जीएसटीसंदर्भात एकमत करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागले. त्यात अनेक अडचणी होत्या. पण, देशाच्या विकासासाठी ते एकमत घडवून आणणे आवश्यक होते. जीएसटीच्या माध्यमातून प्रणव मुखर्जी ज्या सुधारणा आणू पाहत होते. त्यामागील कल्पकता डॉ. केळकर यांची होती. त्यामुळे काळा पैसा बंद झाला, कर चुकवेगिरी कमी झाली आणि जीएसटी उत्पन्नाचे उच्चांकी संकलन झाले,’ याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
गडकरी म्हणाले, ‘चाकोरीबाहेरची कल्पना समजून घेण्याआधीच प्रशासकीय यंत्रणा त्याला विरोध करते. मात्र, सर्व नवीन कल्पनांचे केळकर यांनी केवळ स्वागतच केले नाही, तर त्याची योग्य अंमलबजावणी करीत भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिरता दिली. आत्मनिर्भर अर्थव्यवस्था उभी राहण्यासाठी केळकर यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. आगामी सात वर्षांत भारतीय वाहन उद्योग जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर येणार असून, या प्रगतीमुळे जीएसटीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारांना मोठे आर्थिक बळ प्राप्त होणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि ‘फाइव्ह ट्रिलियन इकॉनॉमी’चा पाया डॉ. विजय केळकर यांनी रचला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.’
डाॅ. माशेलकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. देसाई यांनी प्रास्ताविक केले. काका धर्मावत यांनी आभार मानले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी शास्त्रज्ञ आणि अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली जायची. केळकर असेपर्यंत त्याचे पालन होत होते. मात्र, ते निवृत्त झाल्यानंतर ही प्रक्रिया खंडित झाली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ काही सुधारणा सुचवत असतात. त्यांच्या अंमलबजावणीची पोहोचपावती मात्र वैज्ञानिक आणि तज्ज्ञांपर्यंत पोहोचवली जात नाही.- प्रा. एम. एम. शर्मा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ