पुणे – देशी गोवंशाच्या जतनासाठी राज्यातील ४० गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहाय्यातून हा स्मार्ट गोशाळा प्रकल्प साकारणार आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गुरुवारी दिली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि मोरोपंत पिंगळे गोधन फाऊंडेशन यांच्यातर्फे झालेल्या ‘गाईच्या शेणापासून रंगनिर्मिती’ या विषयावरील तांत्रिक चर्चासत्राचे उद्घाटन मुंदडा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश जाधव, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सदस्य जगदीश कदम, डॉ. रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, गोसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष मयुरेश जोगदेव उपस्थित होती.
हेही वाचा – सरकारी कार्यालयांना देणार महावितरण ‘शॉक’
हेही वाचा – तलाठी भरतीतील दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी
महाराष्ट्रातील गोवंशाची संख्या एक कोटी ३९ लाख एवढी असून त्यातील देशी गोवंशाची संख्या १३ लाख आहे. या देशी गोवंशाचा सांभाळ करतानाच एकही गाय कत्तलखान्यात जाणार नाही, हे लक्ष्य ठेऊन गोसेवा आयोगाचे काम सुरू आहे. राज्यात १,०६८ गोशाळा आहेत आणि त्यातील ४० गोशाळा अशा आहेत की ज्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक गायींचा सांभाळ केला जात आहे. या गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार असून तेथील गायीच्या शेणापासून सीएनजीची निर्मिती करण्याची योजना हाती घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारबरोबर करार १७ फेब्रुवारीला केला जाईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. गायीचे शेण आणि गोमूत्राचा वापर, त्यापासून उत्पादने तयार करणे या क्षेत्रात क्रांती होणे आवश्यक असून तसे झाल्यास तर देशी गायी वाचवण्यात यश येईल, असे मुंदडा यांनी सांगितले.