पुणे : ‘नृत्याने मला ओळख, बळ, प्रयोजन, न संपणारी ऊर्जा आणि प्रवाही राहण्याचे सामर्थ्य दिले. त्यामुळे मला निरंतर नृत्याची कास धरता आली. पुण्याने माझे कौतुक केले. माझ्या मनात सकारात्मकता आणि समाधान आहे’, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे यांनी सोमवारी व्यक्त केली.
‘नादरूप’ कथक संस्थेच्या वतीने शमा भाटे यांच्या अमृतमहोत्सव पूर्तीनिमित्त त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणाऱ्या ‘अमृतोत्सव’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ कथक नृत्यगुरू डाॅ. पुरू दधीच, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संगीतकार- गायक पं. हृदयनाथ मंगेशकर आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते भाटे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
शमा भाटे म्हणाल्या, ‘जीवनाच्या या प्रवासात माझे विश्व कथकने व्यापून टाकले. प्रवासातले खड्डे, वेदना, दुःख, अडचणी हे सारे सरून आता निखळ आनंद उरला आहे. नृत्यासह आयुष्य कसे जगायचे, ते गुरू रोहिणीताईंनी शिकवले. संगीताची मूल्ये, निकष गुरू सुरेश तळवलकर यांनी शिकवले. परिश्रमांची तयारी असेल तर कलेची श्रीमंती ईश्वर पदरात देतोच, हे मी अनुभवले. माझ्या अनेक अप्रत्यक्ष गुरूंनी मला कला सर्वांपेक्षा मोठी, श्रेष्ठ आणि उंच असते, हे सांगितले. कुटुंबीयांनी सदैव आधार, पाठिंबा दिला. माझ्या मुलींनी माझे विचार, रचना रंगमंचावर अधिष्ठित केल्या. माझा नृत्यवसा आणि व्रत त्यांच्यामुळे सार्थ ठरले.’
पं. तळवलकर म्हणाले, ‘शमाताईंचा कलाप्रवास मी जवळून पाहिला आहे. कलेप्रती शरणभाव, भक्ती, परिश्रमांची तयारी, शिस्त, निष्ठा असे गुण ज्याच्यापाशी असतील, त्यालाच हे जमते. लयीच्या नेमकेपणाचे संस्कार करून घेण्यासाठी, शमाताईंनी कठोर साधना केली आहे. कथकचे आधारतत्त्व अबाधित ठेवून कित्येक नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले.’
पं. मंगेशकर म्हणाले, ‘पन्नास वर्षांपूर्वी लतादीदींच्या स्वरांमध्ये मीरेच्या विराण्यांची ‘चाला वाही देस’ ही ध्वनिमुद्रिका केली होती. त्याच रचनांवर शमाताईंनी शिष्यांकडून याच शीर्षकाचे अतिशय उत्तम सादरीकरण केले होते. अवघ्या ४ आणि ६ मात्रांमध्ये गिनती किती विविध प्रकारे करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी पेश केले होते.’
पाटील म्हणाले, ‘माझा परिचय तुलनेने नवा असला तरी शमाताईंचे कलाकर्तृत्व माहीत आहे. गुरू रोहिणी भाटे यांच्या नावाने नृत्यमहोत्सव सुरू करण्याच्या निमित्ताने आमचा परिचय झाला. त्यांची कला सदैव रसिकांना आनंद देत राहावी.’
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात शमाताईंच्या शिष्यांनी त्यांच्या संरचनांचे सादरीकरण केले.
कला सर्वांगीण समर्पणाची अपेक्षा करते. कला आणि कलाकार, यांना एकमेकांशिवाय अस्तित्व नसावे, इतकी एकरूपता ती मागते. तेव्हाच कलाकार ही संज्ञा सार्थ ठरते. अशा संपूर्ण कलाकार असलेल्या शमाताईंची समर्पित नृत्ययात्रा निरंतर सुरू राहो.– डाॅ. पुरू दधीच, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू