पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता. खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव हे धरणही १०० टक्के भरले. त्यामुळे वरसगाव, पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकचा विसर्ग दिवसभर कायम ठेवण्यात आला. चारही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २८.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर धरणपरिसरात २५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात ३० आणि ३१ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात चार मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत वरसगाव धरणातून ५७८५ क्युसेकने, पानशेत धरणातून ५४०८ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात २४ मि.मी. पाऊस पडला. सध्या या धरणात ८.३६ टीएमसी म्हणजेच ९८.३१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी वडज, डिंभे, घोड, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर ३.२३ (८७.१९), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ७.५६ (९८.५९), पवना ८.३६ (९८.३१), डिंभे ११.८७ (९५.०४), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६७ (९९.३८), नीरा देवघर ११.५३ (९८.२८), भाटघर २३.५० (१००), वीर ९.०४ (९६.०६) आणि उजनी ५६.०८ (१०४.६९)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water continued released khadakwasla dam water storage pune print news ysh