अतुल सुलाखे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनारसच्या घाटांवरील स्मशानांत राहणाऱ्या डोम किंवा डोंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सदैव दुर्लक्षित राहिलेल्या समाजाचे जळजळीत वास्तव मांडणारे हे पुस्तक, या समाजाच्या सद्य:स्थितीमागची राजकीय कारणे मांडणे का टाळते, हे मात्र कळत नाही..

 ‘मरणात खरोखर जग जगते’ असे म्हणताना जीवनातील अंतिम आणि अटळ सत्य अभिप्रेत असते. या ओळीचा वेगळया दृष्टीने विचार केला, तर मरण हीच ज्यांची जीविका आहे अशा माणसांनाही ती लागू होते. खरेतर कोणीही असे जिणे स्वत:हून पत्करत नाही. तरीही आपल्या सामाजिक व्यवस्थेत असे अनेक समूह आहे. त्यातीलच एक समूह म्हणजे डोम अथवा डोंब.

डोंब, चांडाळ, राजा हरिश्चंद्राची दु:खद कहाणी अशी या समूहाची ओळख आहे. क्रूर, उग्र रूप. राहाणीही त्याला साजेशी. ही घसरण ‘डोम’ कावळयापर्यंत जाते. पक्ष्यांमधील कुरूप आणि अशुभ मानल्या जाणाऱ्या जिवाला या समूहाचे नाव दिले गेले, यावरूनच त्याचे सामाजिक स्थान स्पष्ट होते. खरेतर डोंब समाज कलांमध्ये निपुण. गायन-वादनात कुशल. तरीही आज तो अतिशूद्र म्हणून जगतो. त्याच्या जगण्याचा अभ्यासू आढावा घेणारे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘फायर ऑन द गँजेस : लाइफ अमंग द डेड इन बनारस’ हे राधिका अय्यंगार यांचे पुस्तक या समाजाच्या व्यथा शब्दबद्ध करते. राधिका यांचे हे पहिलेच पुस्तक असले तरी त्या पूर्वीपासूनच अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित आहेत. पत्रकारिता करताना एकाच विषयात फार गुंतून राहता येत नाही आणि सतत विद्वत्तेचे प्रदर्शन केले तर योग्य तो परिणाम साधता येत नाही. मात्र अय्यंगार यांनी हा तोल नेटकेपणाने सांभाळला आहे. विद्वज्जडता बाजूला ठेवून अत्यंत सखोल व सोप्या भाषेत त्यांनी काशीमधील डोंब समाजाचे आयुष्य टिपले आहे.

चांद आणि मनिकर्णिका या घाटांवरील डोंब  किंवा ‘डोम’ समाजाचे जगणे या पुस्तकात प्रतििबबित होते. स्मशान आणि डोंब असे काही कानावर आले की हरिश्चंद्राच्या गोष्टीपासून स्मशानातील भीतिदायक माणसांपर्यंतच्या अनेक गोष्टी आपल्या डोळयांसमोर येतात. वस्तुत: देशभर पसरलेल्या या समाजाची ओळख विविधांगी आहे. कलाकार, कुशल कारागीर, गुन्हेगार आणि अपवादाने शासक असा या समाजाचा

भूतकाळ आहे. तथापि डोंब म्हणताच गंगेवरील घाटांचे चित्र डोळयांपुढे येते. अशी ओळख होण्याचे कारण, या समूहाचा भूत आणि मुख्यत: वर्तमानकाळ.

हेही वाचा >>> सिंहांच्या अधिवासात चित्त्यांचे मृत्यू

पुस्तकाच्या सुरुवातीला डॉली चौधरी यांचे कथन यते. या बाई पस्तिशीच्या घरातील विधवा. पदरात पाच मुले. नवरा सिकंदलाल चौधरी अकाली गेला. नातेवाईक पाठीशी नाहीत. एक दलित स्त्री, विधवा, शिक्षणाचे पाठबळ नाही आणि आर्थिक आघाडीवर दुबळी स्थिती, अशातच घर आणि संसाराची जबाबदारी एकटीच्या खांद्यावर. पुस्तकात पुढे दु:खाचे कोणते रूप दिसणार आहे, याचा अंदाज आरंभीच येतो. डॉलीच्या निमित्ताने सर्वहारा म्हणजे काय याची विषण्ण करणारी जाणीव होते. कोणत्याही आकडेवारीपेक्षा, पुस्तकांपेक्षा आणि तर्कशुद्ध विश्लेषणापेक्षाही अधिक परिणाम एकटी डॉली साधते. लेखिकेचा अभ्यास जिवंत करते.

नंतरच्या ३०-३५ प्रकरणांत वाराणसीच्या डोंब समाजाचे जगणे लेखिका आपल्यासमोर मांडते. या प्रवासात सुमारे ३५ लोक येतात. स्वत: डॉली, तिचा अकाली आणि संशयास्पद स्थितीत मरण पावलेला नवरा, डॉलीची मुलगी विधी, तिचे भाऊ, आई, सासू, शेजारी असे हे जग आहे. सारेच या व्यवस्थेत होरपळत आहेत. अपवाद फक्त भोलाचा आहे.त्याने एकटयानेच महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. या लोकांचे व्यवसाय मृतदेहांची विल्हेवाट लावणे किंवा त्याला पूरक आहेत. पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा विविध प्रश्न घेऊन आपल्यासमोर उभी राहते. ही काही शोध पत्रकारिता नाही, हे लेखिकेने स्पष्टपणे नोंदवले असल्याने पुस्तकाचा परीघ निश्चित होतो. आपण उच्च वर्गात जन्माला आल्यामुळे या वर्गाच्या व्यथांच्या आकलनात येणाऱ्या मर्यादांचे भानही त्यांना आहे.

बनारसमधील चांद आणि मनिकर्णिका या दोन घाटांवरील चौधरी आणि यादव वस्त्यांमधील लोकांच्या जगण्याचा हा शोध आहे. डोंब समाजाचा इतिहास थोडक्यात सांगून झाल्यावर या समाजातील स्त्रियांच्या मर्यादाग्रस्त आयुष्याचे वर्णन करणारा भाग येतो. इथे डोंब समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करण्यात आली आहे. कलाकारांचा समावेश असलेला हा समाज अतिशूद्र कसा झाला याची नोंद गरजेची होती. महिला अनेक बंधनांनी ग्रासलेल्या तर पुरुष वर्ग तशाच परिस्थितीत जगणारा. अगदी लहान वयातच त्यांच्या समोर आयुष्याचे अंतिम सत्य भेसुर रूपात येते. आता हेच आपले आयुष्य हे त्यांना कदाचित समजत असेल तथापि पेलवत नाही. बनारसला ‘महास्मशान’ म्हणतात. ही ‘विपरीत महता’ हा डोंब समाज रोज पाहत, अवुभवत आहे.

जिथे मृतदेह शांत असतात, ते स्मशान असा स्मशान या शब्दचा अर्थ आहे, हे पुस्तक वाचताना जाणवते. या शांततेची किंमत कष्टी आणि हतबल समाजाकडून वसूल केली जाते. डोंब समूहाच्या जगण्याचा हा वेध कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय पुस्तकात आला आहे. प्रत्येक दु:खाला, अनुभवाची जोड आहे. अनुभवाला अभ्यासाची जोड आहे आणि वाचकांना स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्य आहे. वर्तमानापासून जराही दूर जाता येणार नाही अशी पुस्तकाची मांडणी आहे. पुस्तकातील ग्रांथिक संदर्भ पाहता पुस्तक रिपोर्ताजच्यापलीकडे जाते.

डॉली आपले दु:ख सांगताना म्हणते, या लग्नामुळे मी बर्बाद झाले. मला सांगा नवरा नसेल तर माझे अस्तित्व काय आहे? डॉलीचा शेजारी आकाश स्वत:चे दु:ख सांगतो. सर्वहारा स्त्री आणि तसाच पुरुष असे दोघेही बोलतात तेव्हा त्या समूहाची खरी ओळख पटते. मळके कपडे, तुटक्या चपला आणि पायावर चितेचे चटके, आजवर आकाशाने असंख्य प्रकारचे मृतदेह पाहिले. त्यांना पाहून वाटणारी भीती, किळस, अशा भावनांना नेहमीच सामोरे जावे लागते. या भयावह स्थितीतून त्यांना केवळ व्यसनेच बाहेर काढू शकतात. या समाजातील पुरुष याच कारणांनी व्यसनांची वाट धरतात.

ही मुले साधारण दहाव्या- अकराव्या वर्षी कामाला लागतात. सुरुवातीला वडील मंडळींच्या हुकूमाखाली आणि चार- पाच वर्षांनी स्वतंत्रपणे. ही वाटचाल पाहता डोंब समाजातील मुले किती लवकर व्यसनांच्या कचाटयात सापडत असतील, याचा अंदाज येतो. शरीर आणि मनाचे असे दु:ख फार काळ झेपत नाही. या कामांचा मोबदला म्हणून पुरुषाला रोज ५० ते ६० रुपये मिळतात. वरची कमाई आणि स्मशानातील वस्तू यांचा विचार करता ही कमाई रोज शंभरच्या घरात जाते. काम कमीत कमी १२ तास.

हेही वाचा >>> कलाकारण : सौंदर्यनिर्मितीचा प्रवाही धर्म..

आकाशपेक्षा लक्ष्य वेगळा आहे. त्याचे आणि आकाशचे पटत नाही. आकाश हा व्यवसाय सोडत नाही, पण लक्ष्य मात्र या कामाला पर्याय शोधतो आहे. हा लक्ष्य डॉलीचा भाऊ! लहानपणी तो घाटावर भुरटया चोऱ्या करायचा. पुढे मात्र एका मल्लाहाने त्याला अन्य व्यवसायाची दिशा दाखवली. आकाश त्या मित्रासोबत नावाडी म्हणून काम करू लागला.

डॉली आणि विशालसोबतच, लक्ष्य, मोहन, भोला आदींच्या व्यथाकथनातून डोम समाजाची व्यथा अय्यंगार मांडतात. डोम समाजातील महिला, मुली, तरुण, लहान मुले, बालके, यांचे आयुष्य लेखिकेने तटस्थपणे मांडले आहे. परिणामी ही माणसे कशी दिसत असतील, याविषयीचे कुतूहल जागे होते.

करोना साथीचे या समाजावर झालेले परिणाम हादरवून टाकणारे आहेत. संपूर्ण देशात कडक टाळेबंदी असताना डोम समूहातील लोक मृतांच्या चिता पेटवत होते. तेही आरोग्यविषयक कोणतीही काळजी घेण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असताना. ज्यांनी अशा स्थितीतही मानवतेच्या दृष्टिकोनातून काम केले, अशा माणसांना समाज म्हणून कशी वागणूक दिली जाते, याविषयी विचार करण्यास हे पुस्तक भाग पाडते. अस्वस्थ करते.

वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे, ही गोष्ट लक्षात घेतली तर गेल्या दहा वर्षांत या समाजाच्या आयुष्यात काही बदल झाला का, त्यांचे जीवनमान सुधारले का, या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखिका करते. हे प्रश्न दोन प्रकरणांत हाताळले आहेत. एवढा अपवाद वगळता पुस्तकात समकालीन राजकारणावर अन्य कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. शेजारच्या बिहारमध्ये डोंब समाज सामाजिक आणि राजकीयदृष्टया मुख्य प्रवाहात येऊ पाहात आहे. भोलाराम तूफानी ते रामविलास, अशा नेत्यांनी डोंब समाजाच्या जागृतीसाठी कोणते प्रयत्न केले, याची नोंद पुस्तकात असणे अपेक्षित होते. पुस्तकात राजकारण आणले तर मुख्य मुद्दा बाजूला राहील आणि विषय  भरकटेल या भीतीने राजकीय पक्ष आणि नेते यांना बाजूला ठेवले असावे, तथापि प्रत्येक समाजाला एक राजकीय भूमिका घ्यावीच लागते आणि विषमतेच्या उतरंडीत जसजसे तळाकडे जावे तशी ती अपरिहार्य ठरते. त्यादृष्टीने पुस्तकात काहीही भाष्य नाही.

शरणकुमार िलबाळे यांच्या ‘अक्करमाशी’चा संदर्भ यात येतो, पण महंमद खडस यांची ‘नरकसफाईची गोष्ट’ मात्र दिसत नाही. लेखिकेने जवळपास दशकभराचा काळ या विषयात गुंतविला आहे. यात अनुभव आणि अभ्यास यांचा समावेश आहे. ‘केस स्टडीज’सदृश अराजकीय लिखाण वाचकांसमोर येते. ही सगळी नोंद, एका लेखिकेने, एक महिला केंद्रस्थानी ठेवून, केली आहे म्हणून याचे विशेष महत्त्व आहे. डोंब किंवा अशा अन्य समूहांना जाणून घेताना, हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल, कारण हा संपूर्ण दस्तावेज अनाग्रही आहे. पुस्तकाची आवृत्ती आली तर डोंब समाजाची राजकीय आणि सामाजिक जडणघडण लेखिकेने आवर्जून मांडावी. पुस्तक आणखी नेमके आणि व्यापक होईल.

फायर ऑन द गँजेस : लाइफ अमंग द डेड इन बनारस

लेखिका : राधिका अय्यंगार

पाने : ३४६

प्रकाशन : अ‍ॅन इम्प्रिंट ऑफ हार्परकॉलिन्स

किंमत : ५९९ रुपये

satul68@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review fire on the ganges life among the dead in banaras by radhika iyengar zws